Saturday, March 23, 2013

तहसीलदार कँटीनची झणझणीत मिसळ


 
मुंबईचं धाकटं भावंडं समजल्या जाणाऱ्या ठाण्यामध्ये खवय्येगिरीसाठी अनेक ठिकाणं प्रसिद्ध आहेत. अनेक ठिकाणची रेस्टॉरंट्स, डायनिंग हॉल तर जागोजागी मिळणारे वडापाव, चाट कॉर्नर्सवर लोकांची गर्दी दिसते. स्टेशनपासून काही अंतरावर असणारं एक ठिकाण मात्र कायम गर्दीने अक्षरशः झाकून गेलेलं असतं. ते रेस्टॉरंट नाहीये. ती वडापावची गाडीही नाहीये. ना ती कुठली खानावळ आहे. ते ठाण्याच्या मामलेदार कचेरीखाली असणारं एक कँटिनसदृश ठिकाण. हे सुप्रसिद्ध आहे ते येथे मिळणाऱ्या मिसळीसाठी. इथली तिखट झणझणीत मिसळ संबंध मुंबईत फेमस आहे. लोक इथे लाईन लावून उभे असतात. रोज सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १०.३० पर्यंत हे कँटीन सुरू असतं. रविवारी मात्र कँटीन बंद असतं. एक प्लेट मिसळ मागवल्यावर 2 ग्लास पाणी लागतंच लागतं. आणि नाका-डोळ्यांतूनही चांगलंच पाणी निघतं. या कँटीनबद्दल अधिक माहिती मिळाली ती त्याचे मालक लक्ष्मण मुरुडेश्वर यांच्याकडून


 
या हॉटेलचं नक्की नाव काय आहे?
नाव असं काहीच नाही. पहिल्यापासून सगळे याला तहसीलदार कँटीन असं म्हणतात. याच नावाने सगळे ओळखतात.
 
कधी सुरू झालं हे कँटीन?
 
साधारण 46 -47 साली कँटीन सुरू झालं. माझे वडील नरसिंह मुरूडेश्वर यांनी हे कँटीन सुरू केलं होतं. आमचं मूळ गाव कारवारमधील मुरूडेश्वर. पण तिथल्या हालाखीच्या परिस्थितीमुळे वडील इथे आले. तहसीलदार कार्यालयाखाली चहापाण्याची टपरी सुरू केली. त्याचंच आता वाढता वाढता हे कँटीन बनलं आहे. १९५२ पर्यंत माझे वडीलच हे कँटीन संभाळत होते.
 
हे कँटीन प्रसिद्ध कशामुळे झालं?
 
खरं सांगायचं तर १९६० सालापर्यंत फारसं गिऱ्हाईक नव्हतंच आमच्याकडे. तहसीलदार कार्यालयामुळे थोड्या प्रमाणात चालत होतं कँटीन. पुढे ठाणे शहर मोठं होऊ लागलं, लोकसंख्या वाढू लागली. ठाण्यातली वस्ती वाढली. त्यामुळे आमच्या कँटीनला बरे दिवस आले. MIDC इथे आल्यापासून आमच्याकडील मिसळीचा खप मोठ्या प्रमाणावर वाढला. आज आमच्याकडे ६० लोक काम करतात.
 
हे कँटीन मिसळीसाठी एवढं प्रसिद्ध कसं झालं?
 
इथली मिसळ खूप तिखट आणि झणझणीत असते. त्यामुळे ज्यांना झणझणीत खायची आवड आहे, ते लोक हमखास आमच्याकडे मिसळ खायला येतात. ही मिसळ खाताना नकातून, डोळ्यांतून पाणी येतंच येतं. ज्या लोकांना एवढी झणझणीत मिसळ खाणं शक्य होत नाही, त्यांच्यासाठी आम्ही मीडियम तिखट मिसळही बनवतो. तरी लोकांना तडका मारलेली झणझणीत मिसळच हवी असते. आम्ही इतरही अनेक पदार्थ कँटीनमध्ये ठेवले आहेत. अगदी लाडू, शंकरपाळेसुद्धा आमच्याकडे मिळतात. पण सर्वाधिक खप होतो तो मिसळीचाच. ताक, लस्सी, कोल्ड ड्रिंक्सही चांगल्या प्रमाणात विकली जातात. पण त्याचं श्रेयही आमच्या झणझणीत मिसळीलाच जातं. दिवसाला कमीत कमी १००० प्लेट्स मिसळ तरी जातेच जाते.

 
तुमच्याकडील मिसळ बऱ्याच राजकारण्यांमध्ये, अभिनेत्यांमध्ये प्रसिद्ध आहे...

 
आहे खरी.. पण ते लोक इथे येऊन कधी मिसळ खात नाहीत. ही जागा खूप लहान आहे. भर बाजारपेठेत आहे. त्यामुळे एखादे नेते ठाण्यात आले असतील, तर त्यांची माणसं इथून मिसळ पार्सल घेऊन जातात. राज ठाकरेंना आमच्याकडील मिसळ आवडते. पण, ते कधी इकडे येऊन तर खाणार नाहीत. त्यामुळे मी खात्रीपूर्वक त्याबद्दल सांगू शकत नाही. कलाकारांचं म्हणाल, तर गडकरी रंगायतनला बऱ्याच वेळा आमच्याकडील मिसळ मागवली जात असते. त्यामुळे बऱ्याच मराठी कलाकारांना आमच्याकडील मिसळ आवडल्याचे अभिप्राय आम्हाला मिळाले आहेत.
 
तुम्हीही पहिल्यापासून हे कँटीन संभाळण्याचंच काम करायचं ठरवलेलंत का?
 
ते आपोआप घडलं. हे कँटीन एवढं मोठं होईल, प्रसिद्ध होईल असं कधीच वाटलं नव्हतं. पण १९६० नंतर ते नावारुपाला आलं. तो पर्यंत मी वडिलांसोबत इथे यायचो. शिक्षणात फारसा रस नव्हता. त्यामुळे यातच पुढे लक्ष घालायचं ठरवून मी काम करू लागलो. कँटीन संभाळणारी माझी पिढी ही दुसरीच. या पिढीत मी एकटाच असल्यामुळे मीच कँटीन संभाळू लागलो.

 
वडिलांनंतर तुम्ही कँटीन संभाळू लागलात, तेव्हा मिसळीची ती चव ठेवणं कसं जमलं?
 
आमच्याकडे पहिल्यापासून मिसळीसाठी मसाल्यांचं एक माप ठरवून दिलेलं आहे. त्याच प्रमाणात आम्ही आजही मसाले घालतो. त्यामुळे मिसळीची चव अबाधित राहिली आहे.

 
हे कँटीन संभाळणारी तुमची दुसरी पिढी... पुढच्या पिढ्यांचा काय विचार आहे?
 
१९९१ साली आम्ही जवळच आमंत्रण हॉटेल उघडलं. माझा मुलगा ते हॉटेल संभाळतो. त्याचा मुलगा सध्या कॉलेजला आहे. त्याने पुढे या व्यवसायात उतरायचं की नाही, हे तोच ठरवेल.
 
केवळ ठाण्यापुरतंच मर्यादित राहाण्याचा विचार आहे की मुंबईतसुद्धा ही मिसळ उपलब्ध करून देण्याच्या योजना आहेत?
 
व्यवसाय वाढवण्याचा विचार आहे. पण, वयाप्रति ते मला सध्या शक्य वाटत नाही. माझं वय आता ६३ आहे. भविष्यात पुढच्या पिढ्यांनी त्यासाठी काम केलं, तर नक्कीच मुंबईतसुद्धा आमची मिसळ मिळू शकेल.

-    रवीश निमकर
९९२०७०२९१७
('लाजरी' या दिवाळी अंकाच्या 2012 च्या अंकासाठी घेतलेली 'खमंग' मुलाखत.)


‘बडे मियाँ’ तो बडे मियाँ....



मुंबई महानगर... या महानगराच्या पोटात सगळीकडे पोटार्थी लोकांची गर्दी.. आणि या गर्दीची पोटं भरण्यासाठी वडापावच्या गाड्यांपासून ते उंची फाईव्ह स्टार हॉटेल्सपर्यंत सगळेजण योगक्षेमं वहाम्यहम् म्हणत हात जोडून उभे असतात. मुंबईच्या कुलाबा कॉजवेमध्येही एकीकडे ताजसारखं विश्वविख्यात फाईव्ह स्टार हॉटेल आहे, तर त्याच्याच मागच्या गल्लीत बडे मियाँसारखं अपरात्रीसुद्धा पोटाचे आणि जीभेचे चोचले पुरवणारा रोडसाईड ठेलादेखील आहे. म्हटलं तर ठेला पण ताज हॉटेलइतकाच मुंबईत नावाजलेला ब्रँड बनला आहे. 
बडे मियाँच्या मालकांपैकी एक असणाऱ्या सलमान शेखशी बडे मियाँबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांना भेटलो. आणि मुंबईतल्या या सुप्रसिद्ध बडे मियाँबद्दल माहिती मिळवली.

बडे मियाँ मूळचे कुठले?
उत्तर प्रदेशातील बिजनौर या छोट्या गावातले. तिथून १३ वर्षांचा यासीन मोहम्मद मुंबईत आला. मटणाचे तुकडे करणं आणि वेगवेगळ्या हॉटेलांना पुरवण्याचं काम तो करत असे. त्यांची गुरू हाजरत फिदा मोहम्मद आदम चिश्ती यांच्यावर प्रचंड श्रद्धा होती. त्यांनी लोकांची उत्तम आणि प्रामाणिकपणे सेवा करण्याची शिकवण दिली होती. बक्षिस म्हणून या मुलाला २० रुपयेही दिले आणि सीख कबाबांचं दुकान उघडण्याची सूचना केली. हा मुलगा मोहम्मद यासीन म्हणजेच बडे मियाँ...   
बडे मियाँची स्थापना कधी आणि कशी झाली?
स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वर्षभर आधी म्हणजे १९४६मध्ये मोहम्मद यासीन यांनी या कुलाबा कॉजवे परिसरात फूटपाथवर सीख कबाब विकायला सुरूवात केली. त्यावेळी त्यांच्याकडे केवळ १ शेगडी होती. त्यावरच सीख कबाब भाजले जायचे. मोकळ्या हवेत या भाजल्या जात असलेल्या कबाबांचा वास असा काही जाणाऱ्या येणाऱ्यांना धुंद करायचा, की आपोआप कबाब खायला पावलं वळायची.. हळूहळू या कबाबांचे शौकीन वाढले.. व्यवसाय वाढत गेला आणि बडेमियाँ मुंबईतील एक महत्वाचं फूड जॉइंट बनलं. मोहम्मद यासीन यांचा उत्तर भारतीय खानदानी मुस्लिम पेहराव पाहून लोक त्यांना बडे मियाँ संबोधत असत. अखेर या सीख कबाब कॉर्नरला बडेमियाँ हेच नाव पडलं.
एवढं प्राइम लोकेशन कसं काय मिळालं?
दक्षिण मुंबईतील कुलाबा कॉजवे हा श्रीमंत आणि पर्यटकांनी गजबजलेला भाग वाटत असला, तरी त्या काळी या रस्त्याला अक्षरशः सामसूम होती. उलट,  चिश्तींनीही जेव्हा या ठिकाणी सीख कबाबांचं दुकान उघडण्याची कल्पना ऐकवली, तेव्हा बडे मियाँनी हाच प्रशन विचारला, की या वैराण भागात माझे कबाब खायला येणार कोण? पण चिश्तींनी याच जागेत बडे मियाँना भरभराटीचं मूळ असल्याचा विश्वास दिला... आणि घडलंही तसंच... बडे मियाँचं नाव आणि कबाब लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. दूर दूरवरून लोक बडे मियाँकडे कबाब खाण्यासाठी वाट वाकडी करून येऊ लागले. बडे मियाँचं नाव नावारुपाला येण्यामागे सर्वांत मोठा हात मात्र भारतीय नौदलाचा आहे. इथून जवळच असलेल्या नेव्हीच्या क्वार्टर्समधील ऑफिसर्स पहिल्यापासून मोठ्या प्रमाणावर इथे येऊन कबाब खात. बडे मियाँ हे नावदेखील या नेव्हीच्या लोकांकडूनच मोहम्मद यासीन यांना मिळाले.
इथले कुठले पदार्थ जास्त लोकप्रिय आहे?
पूर्वी मटणाचे पदार्थ जास्त खाल्ले जात. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात लोकांची आवड बदलली. त्यांना चिकन खाणं जास्त आवडू लागलं. त्यामुळे आज चिकनचे पदार्थ जास्त खाल्ले जातात. चिकन सीख कबाब रोल, चिकन टिक्का, चिकन खिमा यांसारख्या पदार्थांची मागणी आज सर्वांत जास्त आहे. त्यामुळे चिकनचेच पदार्थ जास्त आहेत. मात्र आता व्हेज पदार्थही लोकांना आवडू लागले आहेत. मुख्य म्हणजे आम्ही व्हेज साठी काऊंटरही वेगळं ठेवलंय. जेव्हा एखादा खाणाऱ्यांचा ग्रुप येतो, तेव्हा त्यातले काहीजण शाकाहारी असतात, गुजराथी आणि मारवाडी समाजाचे बरेचजण इथे येतात. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही व्हेज काऊंटर वेगळं उघडलंय. आता तिथेही बरीच गर्दी असते. आज ६५% लोक इथे नॉन-व्हेज खात असतील, तर ३५% लोक व्हेज फूड खातात. इथले पनीर टिक्का, पनीर सीख कबाबही खूप लोकप्रिय आहे.
ही बडे मियाँची कितवी पिढी?
आमची पिढी ही तिसरी पिढी... बडे मियाँची पाच मुलं. ते हे व्यवसाय संभाळू लागले. यांची मुलं म्हणजे आमची पिढी बडे मियाँ संभाळत आहे. आमच्या पिढीत एकंदर १३ भावंडं आहेत. सर्व मिळून एकत्र हा व्यवसाय संभाळतो.
लहानपणापासून तुम्ही हाच व्यवसाय संभाळण्याचं ठरवलेलंत का?
हो. आमच्याकडे कुणाला कधी याच व्यवसायात येण्याची बळजबरी नसते. पण, बडे मियाँचाच व्यापार एवढा मोठा आहे, की तो संभाळण्याचंच काम आपोआप करायला लागलो. पुढच्या पिढीचंही कदाचित तसंच होईल. मुळात, बडे मियाँचं नेहमी सांगणं असायचं, की नोकरी करू नका, नोकरी करणाऱ्याला  एक दिवस निवृत्ती स्वीकारावी लागते. त्यामुळे आम्ही शेवटपर्यंत बडे मियाँतर्फे कायम लोकांची सेवा करू.
तुम्ही बडे मियाँ संभाळण्यापूर्वी काही विशेष शिक्षण घेतलेलंत का?
हो. मी आयएचएम, औरंगाबादमधून हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं. त्यानंतर अनुभवासाठी काही काळ विदेशातील हॉटेल्समध्ये कामही केलं. माझी बहुतेक भावंडंही याच मार्गाने व्यवसायात शिरतील.
पण इतकी वर्षं तुम्ही बडे मियाँच्या पदार्थांची चव, गुणवत्ता तशीच कशी काय राखू शकलात?
याचं कारण म्हणजे आमच्या कुटुंबाला बडे मियाँनी दिलेला सिक्रेट मसाला.. तो मसाला फक्त आमच्या कुटुंबालाच माहित आहे. आजही बडे मियाँमध्ये पदार्थ बनवताना त्यात मसाला आम्ही आमच्या हातानेच घालतो. तसंच सकाळी चिकन, मटण ते अगदी पनीरही आम्हा कुटुंबियांपैकीच एकजण सकाळी जाऊन आमच्या ठरलेल्या सप्लायर्सकडून जिन्नस निवडून आणतो. अर्थात ते मसाले आणि सप्लायर्स यांची माहिती आम्ही कधीही उघड करत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आमच्या काउंटरवर पाहिलं असेल, तिथ कुठल्याही प्रकारची स्टोअरेज सिस्टम नाही, फ्रिज वगैरे नाही. आम्ही ग्राहकांना कायम ताजे पदार्थच देतो. एखादवेळेस जिन्नस कमी पडले तर सप्लायर्सकडून ऐनवेळी मागवतो. पण, बेगमी करून ठेवत नाही.
दिवसाला साधारण किती ग्राहक येतात?
वीकेण्डच्या सुमारास दररोज संध्याकाळी सुमारे १ लाख लोक येतात. इतर दिवशीही साधारण तेवढीच गर्दी असते. इथे मर्सिडिससारख्या गांड्यांमधून लोक खायला येतात, आणि कारच्या टबवर प्लेट ठेवून खातात, इतकं त्यांना बडे मियाँचं आकर्षण आहे. विदेशी पाहुणेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर येतात. ते एवढं मसालेदार खाऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी सौम्य मसाले वापरून कबाब बनवतो. तसंच काही वेळा प्रवासामध्ये ऍडव्हेंचर म्हणून विदेशी लोक स्पेशल तिखट, मसालेदार पदार्थही मागवतात. सौदी अरेबिया, युरोप, अमेरिकेतून आलेल्या लोकांनाही बडे मियाँतले पदार्थ खूप आवडतात. ताजमध्ये पार्टीसाठी आलेले, आसपासच्या डिस्कोथेकमध्ये थिरकायला आलेले कित्येक तरुण रात्री- अपरात्री बडे मियाँमध्ये गरमा-गरम कबाब, टिक्के खायला येतात. मोकळ्या हवेत रात्रीच्या वेळी बडे मियाँचे कबाब खाणं ते फाईव्ह स्टारच्या वातावरणापेक्षा जास्त एंजॉय करतात.
कुणी सेलिब्रिटी येतात?
राज कपूर बडे मियाँच्या कबाबांचे खूप शौकीन होते. मुंबईतले बहुतेक सगळे सेलिब्रिटी इथे हजेरी लावत असतात. टीव्हीवर काम करणारे जवळपास सर्वच कलाकार रात्री इथे येतात, जॅकी श्रॉफ तर महिन्यातून दोन-तीन वेळा येतातच येतात. पण सेलिब्रिटी म्हणून कुणाला वेगळी वागणूक मिळत नाही. आमच्यासाठी आमचा प्रत्येक ग्राहक सेलिब्रिटीच असतो.
भविष्यात बडे मियाँचा पसारा आणखी वाढवण्याचा काही विचार आहे का?
नक्कीच आमचा तसा इरादा आहे, गेल्या ८० वर्षांत पहिल्यांदाच आम्ही हॉर्निमन सर्कलला मोठं रेस्टॉरंट उघडलं आहे. अशीच आणखी रेस्टॉरंट्स उघडण्याचा आमचा मानस आहे. मात्र चेन किंवा फ्रंचाइजी बनवण्याची आमची इच्छा नाही. ज्याप्रमाणे मघाशी म्हणालो त्याप्रमाणे पदार्थांमध्ये मसाला घालण्याचं काम आमच्याच कुटुंबातील लोक करतात. ते मसाले आम्ही कुणासमोर उघड करत नाहीत. त्यामुळे इतरत्र जरी बडे मियाँची हॉटेल्स उघडली, तरी ते काम आमचंच कुटुंब करेल. सध्या आम्ही लक्ष मुंबईवर केंद्रित केलं असलं, तरी इन्शाल्ला भविष्यात देशभरात बडे मियाँची हॉटेल्स उघडण्याचा आम्ही प्रयत्न करू....   
 
आदित्य (रवीश) निमकर
9920702917
('लाजरी' या दिवाळी अंकाच्या 2012 च्या अंकासाठी घेतलेली 'खमंग' मुलाखत.)