Sunday, May 17, 2020

मतकरींच्या गूढकथांचा आशय

मराठीमध्ये गूढकथा हा विषय म्हटला की पहिलं आणि महत्वाचं नाव येतं ते म्हणजे अर्थातच रत्नाकर मतकरी यांचं. नवल सारख्या दिवाळी अंकांत अनेक गूढकथा वाचायला मिळतात. पण त्यातल्या original  कथा किती असतात? बहुतांश कथा या अनुवादित स्वरुपाच्या असतात. मात्र जी कथा original असते, ती रत्नाकर मतकरींचीच असते. त्यातही ती कादंबरी प्रमाणे वर्णनांच्या प्रवाहात भरकटत नाही. अत्यंत चोख, गोळीबंद रचनेत या कथेची जादू असते. एखादी लघुकथा लिहिणे आणि गूढकथा लिहिणे, यांत खूप फरक आहे. एखादी कथा लिहिताना चक्षुर्वैसत्यम घटनेचा आधार घेत त्याभोवती काल्पनिक पात्रांची मांडणी करत कथा लिहिणं हे कठीण असलं, तरी अद्भूत ठरत नाही. मात्र, एखाद्या सामान्य घटनेचा वेध घेताना त्याला गुढतेची किनार देणं, त्याच्या अंतापर्यंत त्याच्या शेवटाचा अंदाज येऊ न देता, एखादी चकमक घडावी, तद्वत शेवट अंगावर येईल आणि दीर्घकाळ स्मरणात राहील, अशा प्रकारे त्याची रचना करणं, हे गुढकथेचं सामर्थ्य आहे आणि तेच त्याचं वैशिष्ट्य. दुर्दैवाने मराठीत कथेचा या दृष्टीकोनातून विचार कऱण्याची हिंमत कुणी करत नाही आणि समीक्षकही ठराविक समीकरणाबाहेरची शैली मानत गूढकथेचं अभिजातपण मान्य करत नाही. गूढतेच्या या गर्भात एक नात्यांची वीण असणारी लघुकथाच असल्याचं विसरणं चूक आहे.
मतकरींच्या गूढकथा वाचल्यावर या कथेच्या शैलीमध्ये असणारं वेगळेपण नजरेत भरतं. गुढतेची झाक आली, की कथा आपोआप पुढे सरकताना वाचकाला ओढू लागते. गूढकथेचं विश्व वेगळं असेल, तर वाचकाला कथा आवडू शकते. पण ती त्याला आपलीशी वाटत नाही. मतकरींच्या कथेशी वाचक अधिक समरस होऊ लागतो. कथा अर्ध्यातच सोडून देण्याची शक्यताच नष्ट होऊन जाते. कारण मतकरींच्या बऱ्याचशा कथेतील पात्रं मुळात प्रथम पुरुषी असतात. आत्मकथन करत आपला अनुभव मांडतात. हे त्यांच्या कथांचं ठळक वैशिष्ट्य. एखादा माणूस स्वतःचा अनुभव सांगू लागतो, तेव्हा दुसरा त्यात समरस होण्याची शक्यता वाढते. दुसऱ्याच्या आयुष्यातील असामान्य आणि अतार्किक घटनेची माहिती मिळत असेल, तर त्यात जास्त रस घेणं, हा माणसाचा गूणच आहे. त्यामुळे अशा प्रथम पुरुषी पद्धतीने कथेची मांडणी करणं, हे मतकरींच्या कथांना जास्त जिवंत करतं. हे वैशिष्ट्य केवळ गूढकथा असल्यामुळेच अधोरेखित होतं असं नव्हे, कथा गूढ नसली तरीही प्रथम पुरुषी वक्तव्यांमुऴे ती रंजक होते. कथेमध्ये नाट्य असणं, ही कथेच्या रसाळपणाची पहिली अट असते. ती बहुतांश उत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या लघुकथा पूर्ण करतच असतात. मात्र त्याला वेगळा आयाम देण्याचं काम मतकरींच्या लघुकथा करतात. आणि यासाठी लघुकथनाची शैली अधिक प्रभावी आणि धारदार असावी लागते. गूढत्व ही ती शैली आहे.
बहुतांश लघुकथा या लेखकांने ऐकलेले अनुभव किंवा त्यातून त्याला सुचलेलं पुढील काल्पनिक नाट्य यावर आधारित असतात. मात्र त्यातून लेखकांच्या विचार करण्याची शैली प्रतीत होत जाते. एखाद्या माणसाच्या आयुष्याची गोष्ट मांडताना तो कशाप्रकारे जगला, त्याने आयुष्यात काय केलं याचा ताळेबंद असतो. लघुकथेत आयुष्यातील एखादा प्रसंगच लिहिलेला असतो. आणि त्याच्या अंताशी एखादं नाटकीय वळण किंवा काव्यात्मक न्याय यांची बांधणी केली असते. बहुतांश मराठी लघुकथांचा आकृतीबंध याच  स्वरूपाचा असतो. मात्र इथेच मतकऱींच्या विचारसरणीतील वेगळेपण अधोरेखित होताना दिसतं. एखाद्याच्या मृत्यूची बातमी आणि मृत्यूची कथा यात जितका फरक असेल, तितका फरक इतर कथा आणि मतकरींची कथा यांत दिसतो. उदा. भुतांच्या गोष्टी बहुतेक सर्वच गावात ऐकायला मिळतात. कुठल्या तरी घरात, विहिरीत कुणीतरी आत्महत्या केल्याची घटना घडलेली असते. त्याला अनुसरून भुताची  सुरस कथाही ऐकायला मिळू लागतात. पण इथे दुसरा लेखक जर केवळ माणसाच्या आत्महत्येतलं कारुण्य शोधत असेल, तर मतकी त्याचा मनोव्यापार शोधतात. आत्महत्या करण्याची वेळ का आली, याबद्दल एखादा लेखक काल्पनिक कथा रंगवत असेल, तर मतकरी आत्महत्येनंतर त्याची काय अवस्था होत असेल, याचा विचार करत व्यक्तिचित्रण करतात. त्यामुळे त्या व्यक्तिची मानसिकता अधिक प्रखरपणे जाणवते. कथेची सूत्रं वेगळ्या बाजूने फिरवली गेल्याचं जाणवू लागतं. कुठलाही माणूस हा थोड्या फार प्रमाणात विकृत असतोच. हे मानसोपचारतज्ज्ञांचंच विधान आहे. फक्त त्याच्या विकृती किती प्रमाणात आहेत, यावर त्याचं मानसिक स्वास्थ्य अवलंबून असतं. मतकरींच्या कथा नेमक्या या वास्तवाच्याच डोहातून वर येतात. प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्यात एक असं रहस्य असतं, जे त्याला कधीही उघड व्हावं असं वाटत नसतं. ते फारसं भयानक नसतं, खरंतर. पण ते असतं. अशा रहस्यमय घटनांमध्ये बहुतांशवेळा अपराधगंड असतो. आपल्याच एखाद्या निर्णयाचा पश्चात्ताप असतो. आपल्या गुन्ह्याचं दडपण असतं. अशा  माणूस आडकाठीविना सुटल्याचं तर उदहरण आपण अनेकवेळा पाहिलं असतं, पण अशा भावनांना अपराधाची टोचणी लावून पश्चात्तापदग्धतेची वेगळी अवस्था मतकरी आपल्या कथेतून उलगडतात. आता सामान्य माणूस, त्याचं दैनंदिन आयुष्य त्याची चूक, त्याचं प्रेम या सर्व गोष्टी इतरही लेखक दर्शवतात. मतकरीही तेच करतात. त्यामुळे मूळात मतकरींच्या लघुकथा या लघुकथाच असतात. त्यांना गूढकथा म्हणण्याची तशी आवश्यकता नाही. मात्र त्यांचं तंत्र मात्र विलक्षण असतं. वातावरणनिर्मिती, माणसाचं वागणं यातून ते एक गारूड वाचकांच्या मनावर घालतात. 
लघुकथांमध्ये असणारी सर्व वैशिष्ट्यं गूढकथांमध्ये असतात. त्यामुळे गूढकथा या लघुकथांचाच एक प्रकार आहे, हे निश्चित. जेम तेम 5- 6 पानांमध्ये मावणारं पण दीर्घकाळ ठसा उमटवणारं कथानक, मानवी संबंधांमधील गुंतागुंत, अनोखी व्यक्तिमत्व आणि त्यांच्यासोबत आपल्याला एकरूप करणारी वातावरणनिर्मिती या सर्व गोष्टी लघुकथांचं अविभाज्य अंग असतात. मतकरींच्या गूढकथा या सर्व नियमांत बसतात. पण वाचकांना गुंतवून ठेवत शेवटी काहीतरी धक्कातंत्र वापरून अद्भुताचा आनंद देणं, करमणूक करणं एवढ्यावरच मतकरींच्या गूढकथा थांबत नाहीत. त्यामुळेच त्या लौकिकार्थाने लघुकथा एवढीच ओळख राखत नाहीत. या लघुकथा मनोरंजनाची पातळी ओलांडून तात्विक पातळी गाठतात. आध्यात्मिक विचार, सामाजिक प्रश्न, माणुसकी, अगतिकता यांसारखे विषय मतकरींच्या गूढकथांची खरी बलस्थानं आहेत. सामाजिक समस्या मांडणारी एखादी लघुकथा साधारण ज्या रेषेत जाईल, त्या रेषेला खोडून मतकरींना एक वेगळं स्वरूप लघुकथेला दिलं. त्यासाठी गूढ हे माध्यम बनवलं. यामुळे रोजच्या व्यवहारिक पातळीवरील गोष्टींना नवी डूब मिळाली. अज्ञाताशी नातं जोडल्यामुळे ज्ञात गोष्टींकडे पाहाण्याची वेगळी दृष्टी या कथांमुळे मिळते. त्या अर्थाने या कथा मराठी साहित्यातील अत्यंत महत्वाच्या आहेत.

-
आदित्य नीला दिलीप निमकर

Sunday, July 26, 2015

'शिवरायांचा आठवावा पराभव'... नरहर कुरुंदकरांच्या नजरेतून


गेल्या आठवड्यात बदलापूरला संपन्न झालेल्या 'अक्षरसंध्या' कार्यक्रमात आचार्य नरहर कुरुंदकर यांच्या साहित्यावर भाषण देण्याची मला संधी मिळाली.  मी रणजीत देसाईंच्या 'श्रीमान योगी' या ऐतिहासिक कादंबरीला कुरुंदकरांनी लिहिलेली प्रस्तावना भाषणाचा विषय म्हणून निवडली. महाराजांच्या पराभवांची कारणमीमांसा करणाऱ्या प्रस्तावनेत कुरुंदकर शिवाजी महाराजांचा वस्तुनिष्ठ नजरेने व्यक्तिवेध घेतात, हे मी माझ्यापरीने कार्यक्रमात मांडलं. दैवतीकरणापेक्षा, व्यक्तीस्तोम माजवण्यापेक्षा माणूस म्हणून पराभव स्वीकारत, त्यावर मात करत शिवाजी महाराज कसे घडले हे जाणून घेणं आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि जास्त विश्वासाने देशाला पुढे नेण्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. अनेकांनी त्यानंतर पूर्ण भाषण माझ्याकडे मागितलं. ते आज मी ब्लॉगवर अपलोड करतोय. या विषयावर मला बोलायची संधी दिल्याबद्दल सर्व आयोजकांचे आणि श्रोत्यांचे आभार...



नमस्कार, सर्वप्रथम मला बोलायची संधी दिली याबद्दल आयोजकांना धन्यवाद. माझं कुरुंदकरांवर वाचन असलं, तरी बराच काळ मध्ये गेला, ज्यामुळे प्रत्येक मुद्दा माझ्या डोक्यात नाही. इतक्या कमी वेळात मला फारशी तयारीचीही संधी मिळाली नाही. तरी, कुरुंदकर माझे सर्वांत आवडते लेखक असल्यामुळे मी बोलायची संधी सोडणं शक्य नाही.

कुरुंदकरांचे लेख, राजकारण, समाजशास्त्र, संस्कृती, व्यक्तिवेध असं सर्वस्पर्शी आहे. शिवरात्र, जागर, मागोवा, रूपवेध वाचणाऱ्यांना त्यांचा अवाका माहीतच आहे. साहित्यावरचं समीक्षात्मक लिखाण मला फारसं झेपलं नाही, त्यामुळे ते वाचन कमी पडलंय. पण व्यक्तिमत्वांची त्यांनी केलेली समीक्षा मला जास्त भावते. त्यातूनही त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना मला आकर्षित करतात. त्या स्वतंत्र लेख म्हणाव्या अशाच आहेत. पण मांडण्यांची पद्धत आणि औचित्य मला गमतीदार वाटतं.

इरावती कर्वे यांच्या संस्कृती या पुस्तकात त्यांची प्रस्तावना वजा समीक्षा वाचायला मिळते. आता इरावतीबाईंचं पुस्तक आणि त्यात कुरुंदकरांचं लिखाण समाविष्ट असणं खूपच लिथल कॉम्बिनेशन आहे. मला या प्रस्तावनेबद्दल स्वतंत्रपणे बोलायला आवडेल. पण विषय जरा क्लिष्ट आहे. त्यापेक्षा मी दुसऱ्या पुस्तकाला त्यांनी लिहिलेली प्रस्तावना आताचा विषय म्हणून मी निवडलंय. ती प्रस्तावना म्हणजे श्रीमान योगी या पुस्तकाची. हे पुस्तक निवडण्याचं कारण म्हणजे मला वाटतं, उपस्थितांमधल्या बऱ्याच जणांनी हे पुस्तक वाचलं असेल. आणि शिवाजी महाराज म्हणजे अर्थातच आपल्या सर्वांचं आवडतं, वंदनिय व्यक्तिमत्व. आराध्य दैवतच... त्यांना दैवत म्हणतोय... म्हणूनच कुरुंदकर मला आता जास्त रिलिवंट वाटतायत.

रणजीत देसाईंनी महाराजांवर लिहिलेली आणि खूप गाजलेली कादंबरी म्हणजे श्रीमान योगी. मराठीत शिवाजी महाराजांवर झालेल्या बहुतेक कादंबऱ्या या एकाच दिशेने पुढे सरकल्या आहेत. व्यक्तिपुजेच्या दिशेने. श्रीमान योगीही त्याला अपवाद नाही. पण गंमत अशी की या कादंबरीला प्रस्तावना लिहिली ती कुरुंदकरांनी आणि त्यातही धागा असा पकडलाय, की शिवाजी महाराजांचा पराभव अधोरेखित करणारा. आता महाराजांचं दैवतीकरण सुरू असताना, जे आजही सुरूच आहे. त्यात तर्कशुद्ध विचार करायला गेलं की काय घडतं, हे आपल्याला माहीत आहे. गोविंद पानसरे यांचं उदाहरण आपल्यासमोर आहे.

रणजीत देसाईंनी श्रीमान योगीसारख्या पुस्तकासाठी कुरुंदकरांकडे प्रस्तावना मागावी, त्यांनी ती द्यावी आणि ती पुस्तकाच्या प्रकृतीला साजेशी वाटूनही वेगळ्या वाटेवरची ठरावी अशी असणं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ती स्वीकारली जाणं हा महाराष्ट्रातल्या साहित्य सांस्कृतीचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बुद्धिवादी विजय आहे.
बरं, श्रीमान योगी पुस्तकाला कुरुंदकरांनी प्रस्तावना देताना महाराजांच्या पराभवांबद्दल का लिहावं?

असेलही पराभव झालेला, पण आपण आपल्या महाराजांच्या पराभवाची विश्लेषणं करण्यापेक्षा त्यांच्या विजयाचा उत्सव साजरा करणं आणि त्यातून प्रेरित होणं जास्त संयुक्तिक नाही का, असा प्रश्न कोणत्याही शिवप्रेमी मराठी माणसाला पडणं शक्य आहे.
आज कुरुंदकर असते, तर त्यांच्या या लिखाणावर तथाकथित शिवप्रेमी तुटून पडले असते. पराकोटीची टीका केली असती. त्यांचं निजाम शासित मराठवाड्यात गेलेल्या बालपणापर्यंत टीका केली गेली असती.

पण कुरुंदकरांना हा पराभव मांडावासा का वाटला, हे कोण पाहाणार ? कुरुंदकर वाद निर्माण व्हावा म्हणून लिखाण करत असले, तरी फालतू वाद निर्माण करणं त्यांचा उद्देश नव्हता. वादातून ठिणग्या उडाल्या की त्यातून अग्नि निर्माण होतो आणि प्रकाशाचा शोध लागतो, हा मानवी इतिहास आहे. कुरुंदकरांनी आपल्या लिखाणातून कसं समोरच्याला निरुत्तर केलं याबद्दल टाळ्या वाजवणं हा आपण Mature न झाल्याचं लक्षण आहे. कुरुंदकरांना अपेक्षित होतं ते समोरच्याने यावर विचार करून प्रतिवाद करावा. आता त्यानंतर कुरुंदकर प्रत्युत्तर देत बसले असते की नसते, हा कल्पनेतला भाग आहे.

याबाबत त्यांचंच उत्तर निवडक पत्रेपुस्तकात आहे. ज्यात त्यांनी म्हटलंय, पूर्वी उपेक्षा करून मारण्याचा प्रयत्न झाला. मी शिल्लक आहे. आता आक्रस्ताळेपणा, उपहास करण्याचा प्रयत्न आहे, याने मी मरणार नाही. माझे मरण मला निरुत्तर करणाऱ्या खंडनात आहे. जे मला पुरावा व तर्क यांनी खोडून काढता येत नाही. ते मी हट्ट न करता निमुटपणे स्वीकारतो. म्हणून कुणी मला निरुत्तर करणारे खंडन केले, तर मी माझी मते सोडून त्याची मते स्वीकारेन. ते माझे खरे मरण आहे. त्या मरणाची मला भीती आहे आणि त्या मरणाचे आकर्षणही. तेव्हा मी नामशेषही होईन आणि कृतार्थही.
 भीष्मांनी जसा आपल्या मरणाचा मार्ग आपल्या स्वकीय शत्रूंना सांगावा, तसा काहीसा हा प्रकार आहे. पण मुख्य म्हणजे कुरुंदकर नामशेष झालेले नाहीत. यातच त्यांचं अमर असणं अधोरेखित होतं.

तर आता पुन्हा महाराजांच्या पराभवावर त्यांनी केलेल्या समीक्षेकडे वळू. कुरुंदकर हे Devil’s Advocate नव्हते. वादासाठी वाद ते करत नव्हते. श्रीमान योगीला प्रस्तावनेतच पराभवांची आठवण देणं हा काही चिप पब्लिसिटीचा प्रकार नव्हता.

त्यांनी असं लिहिण्यामागचं कारण त्यांनी प्रस्तावनेच्या शेवटच्या परिच्छेदात स्पष्ट केलंय, ते देसाईंना सूचित करताना म्हणतायत, मला ही म्हणजे शिवरायांची विलक्षण व्यक्तिरेखा काल्पनिकाच्या पसाऱ्यात गमावली जाण्याची भीती वाटते. या एका वाक्यात कुरुंदकरांचं शिवप्रेमही व्यक्त होतं आणि त्यांची भूमिकाही. आणि दुर्दैवाने आज त्याची प्रचितीसुद्धा येतेय.

स्वप्नाळू, भक्तीभावाने कोणाच्याही आहारी न जाता तटस्थपणे वस्तुनिष्ठ विश्लेषण करणं हा कुरुंदकरांचा स्थायीभावच आहे. त्यातून गांधीही सुटले नाही, नेहरूही नाही आणि आणि कार्ल मार्क्सही. त्यातून तर्क आणि खंडनमंडणाच्या मर्यादा त्यांना माहीत होत्या. केवळ खंडनमंडण आणि तर्क याने मानवी श्रद्धा डळमळीत होत नाहीत. मानवाच्या अनेक सहजप्रेरणा या तर्कातीत असतात याचीही जाण त्यांना होती. जी आज अनेकांना नसल्यामुळे विचारवंतांच्या हत्या घडल्या.

या पार्श्वभूमीवर शिवाजी महराजांच्या पराभवाकडे पाहाताना केवळ शक्ती कमी पडली, म्हणून हे पराभव झाल्याचं कुरुंदकरांनी दाखवून दिलं.  

शिवाजी महाराजांचे १६५६ ते १६४८ या १८ वर्षांचे प्रारंभिक चक्र पराभवावर येऊन थांबते. दुसरं १६५६ ते ६६ हा दशकभरातला पराभव, मिर्झाराजेंसमोर पत्करलेली शरणागती याबद्दल कुरुंदकरांनी ऐतिहासिक तथ्यं मांडत विश्लेषण आणि भाष्य केलंय. मी त्या ऐतिहासिक घटनांमध्ये जात नाही, कारण तो आपला आजचा विषय नाही. विषय कुरुंदकरांचं विश्लेषण करण्याची हिंमत आणि पद्धत आणि प्रस्तावनेतलं त्यांचं स्वतंत्रपणे असलेलं महत्त्व हा आहे.

शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत त्यांनी जिंकलेला बराच मुलुख त्यांना तहाद्वारे परत करावा लागलाय, हे विसरू नका. हा इतिहास पाहिला, तरच तहाच्यावेळी वा पराभवसमयी त्यांनी दाखवलेली मुत्सद्देगिरी आपल्याला दिसेल.

जिथे इतर इतिहासकार शिवाजी महाराजांना शास्त्रोक्त पारंपरिक क्षत्रिय गुणधर्म आणि हिंदू आदर्शवादी मुल्यांच्या चौकटी बसवून त्यांच्या शत्रूशी लढताना खोटी नैतिकता जोडून मोठेपण दाखवण्याच्या अहमहमिकेत सहभागी होत असतात, तिथे कुरुंदकरांनी थेट कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्या निकषांवर शिवाजी महाराजांना पास केलं आहे. म्हणजे शिवाजी अफझलखान भेटीला जाताना पूर्ण प्लॅनिशी तयार होते. आपले मावळे जंगलात दडवून ठेवले होते. दुश्मनाच्या फौजेला गोंधळवून टाकत त्याचा निःपात करण्याची त्यांची योजना तयार होती. हातात वाघनखं होती. आता ती वाघनखं होती की बिचवा की कट्यार... जे असेल ते असेल. पण छुप्या शस्त्रानिशी ते सिद्ध होते. मग अशावेळी अफझलखानाने त्यांना बगलेत दाबून पहिला वार केला आणि म्हणून प्रतिक्रियेदाखल महाराजांनी कोथळा बाहेर काढला, हे फारसं पटणारं नाही. महाराज एवढे कच्चे नव्हते की अफझलखानाला पहिली संधी देऊन मग वार करण्याएवढे. एवढी सगळी तयारी त्यांनी खानाच्या भेटीसाठी केली, त्या भेटीत खानाने वारच केला नसता, तर महाराज बोलणी करून परत थोडीच आले असते? दगाफटका महाराजांनीही केला असू शकतो आणि यात गैर ते काय? खुद्द शिवाजी महाराजांनी मी शत्रूंना दगा दिला. मित्रांना दगा दिल्याचे दाखवा असं आव्हान एका पत्रात दिलंय. याकडे कुरुंदकर लक्ष वेधतात. प्रस्तावनेच्या पान २४ वर लिहिलंय-

शाहिस्तेखानाला शासन हा दगाबाजीचा दुसरा प्रकार. विश्वास देऊन भेटीला बोलावून मारणे, गाफील सेनेवर हल्ला करणे, तहाची बोलणी लावून अंधारातून पळणे यातील काहीच राजपूत धर्मात न बसणारे पण झोपलेल्याला झोपेत मारणे, पळणाऱ्या निःशस्त्रावर हत्यार चालवणे, आडवे आलेले हिजडे, दासी, स्त्रियांची कत्तल करणे हे ही राजपूत धर्मात न बसणारे. एकूण शाहिस्तेखान प्रकरणात शाहिस्तेखानाचा मुलगा, जावई, बायका, सूना, मुली मिळून ६ प्रतिष्ठित स्त्रिया, ६ सामान्य कुळबिणी, ४० पुरुष, ज्यात अनेक पहारेकरी खोजा म्हणजे हिजडे ठार झाले. हा शिवाजी परंपरागत क्षात्रधर्मात बसवू नये. त्यांची संगती कौटिल्याच्या राजधर्मात बसते.

बहुतेक इतिहासकार शिवाजी महाराजांचा पराभव हा नैतिकतेच्या भलत्याच आदर्शवादी मुल्यांमध्ये बसवण्याच्या धडपडीत आहे. महाराजांनी विजयाचे जे मार्ग निवडले, ते आपण निवडण्याची हिंमत आपण करू शकत नाही. आपल्याला महाराजांकडे रामायणाच्या हजारो वर्षांपूर्वीच्या साच्यात बसवायची इच्छा असते आणि तिथेच आपण फसतो. ही खरंतर किती साधी गोष्ट आहे. अगदी बेसिक.. पण हा विचार कुरुंदकरांनी केला, तो अजूनही आपण करत नाही. कुरुंदकरांची इतिहास आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांकडे पाहाण्याची ही दृष्टी आपण कधी मिळवणार?  

कुरुंदकरांचं हे विश्लेषण धक्कादायक आहे. पण त्यात तथ्य आहे. कुरुंदकरांची वाद निर्माण करणारी पद्धत ही परंपरागत विचारांना आव्हान नाही, तर आवाहन असतं. आपलाच राजा, आपलाच इतिहास पण कसा पाहावा हे कुरुंदकर आपल्याला शिकवतात.

शिवाजी महाराजांच्या पराभवाची मीमांसा ते काटेकोरपणे करत असले, तरी व्यक्तीश्रेष्ठत्व ते नाकारत नाहीत, तर त्यांच्यावर फासला जात असलेला दंतकथांचा शेंदूर वेळीच खरवडून काढत खरा शिवाजी आपल्यासमोर त्यांना आणायचा असतो.

ते लक्षात घेतलं नाही, तर काय होऊ शकतं, ते आपण आज पाहातोच आहोत. शिवधर्म नावाचा भलताच खुद्द शिवाजी महाराजांनाही अपेक्षित नसलेला पंथ स्वतःला धर्म म्हणत पसरण्याचा प्रयत्न करतोय. वेगवेगळे राजकीय पक्ष शिवाजी महाराज आपल्या सोयीने वापरतायत. त्यामुळे अशावेळी असा विलक्षण ऐतिहासिक राजा पुराणपुरूष बनून दैवी आवरणांनी खोटा ठरू नये, यासाठी कुरुंदकरांची धडपड आहे.
शिवाजी महाराजांभोवती आख्यायिकांचं जाळं विणलं जातं, यामुळे शिवाजी महाराजांच्या खऱ्या व्यक्तिमत्वावर अन्याय होतो आणि प्रेरणा कशावरून घ्यावी हेच आपल्या लक्षात येत नाही. शिवाजी हे अनन्यसाधारण दैवी आवतार असल्याची आपली धारणा होते. मग त्यांना त्यांची तलवार भवानी मातेने दिल्याचं आपल्याला वाटतं. ते साक्षात शंकराचाच अवतार असल्याचं आपण ठरवायला लागतो. कारण माणूस म्हणून त्यांचे झालेले पराभव आपल्याला दिसतच नाहीत. त्यातून आपण काही शिकूच शकत नाहीत. आपल्याला दिसतो फक्त त्यांचा भव्या उदात्त पराक्रम एके पराक्रम जो आपल्याला शिकवत काही नाही. फक्त आपल्याठायी फुकटचा उन्माद वाढवतो.

आता गंमत म्हणजे कुरुंदकर जितक्या तटस्थपणे विश्लेषण करतात, तितकेच ते शिवाजी महाराजांच्या स्वभावातले इतर कंगोरेही वस्तुनिष्ठ पद्धतीने उलगडतात. शिवाजी महाराजांचे पराभव झाले, ते केवळ आणि केवळ शक्ती कमी पडल्यामुळे हे कुरुंदकरांनी स्पष्टपणे मांडलं आहे. फंदफितुरी, शत्रूवर फाजील विश्वास, क्षमाशील स्वभाव, अव्यवहारी बेसावधपणा, चुकलेलं सेनानियोजन, खचलेला धीर यातलं कुठलंही राष्ट्रघातकी आणि राजेपणाला तडा बसेल असं कारण शिवाजीच्या पराभवामागे नाही, हे कुरुंदकर स्पष्ट करतात. इथेच कुरुंदकरांचं कुरुंदकरपण सिद्ध होतं.



शिवाजी व्यक्तिरेखेला ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातून पाहाताना पराभव हा नकारात्मक भाग म्हणून कुरुंदकर पाहात नाहीत. तर शिवाजीचा व्यक्तिवेध घेताना इतिहासाचा भव्य पटही ते उभा करतात. म्हणजे या प्रस्तावनेत ते एका ठिकाणी लिहितात- परधर्मसहिष्णुतेच्या बाबतीत अशोक, विक्रमादित्य, हर्ष, अकबर यांच्याशी महाराजांची तुलना करता येणं शक्य आहे. पण सर्वांना प्रचंड जनानखाने होते. अकबराचा मीनाबाजार होता. अशोकाची तिष्यरक्षिता होती. शिवाजीने वासना मोकाट सोडली नव्हती.रसिकता, चित्र, शिल्प, संगीत, काव्य यांना उदार आश्रय देणं, मोठमोठ्या इमारती बांधणं इतका पैसाही शिवाजीजवळ नव्हता. त्याला फुरसदही नव्हती, त्याच्या मनाचा तो कौलही नव्हता. तो तुमच्या माझ्यासारखा पापी व उपयोगितावादी माणूस होता.

परधर्मसहिष्णुतेतला फरकही कुरंदकर वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडतात. म्हणजे अकबराची सहिष्णुता ज्या हिंदूंबद्दल होती, त्यामागे व्यवहारज्ञान होतं. म्हणजे बहुसंख्य हिंदूंकडून कर घेऊन वैभव प्राप्त होत होतं. हिंदूंना आक्रमणाचा इतिहास नव्हता. मुस्लिमांच्या कत्तली करणं, बायका भ्रष्टवणं, सक्तीचं धर्मांतर लादणं अशी कुठलीही स्वधर्मासा आणि राज्याला धोकादायक पार्श्वभूमी नसलेल्या हिंदूंना अकबराने औदार्याने वागवणं हे व्यवहार्य होतं तर शिवाजीच्या राज्यात मुस्लिम बहुसंख्य नव्हते. (Muslim minority हा परवलीचा शब्द) त्यांच्याकडून फार मोठा कर मिळत नव्हता. मुस्लिमांच्या तलवारी स्वराज्याला फार उपयुक्त नव्हत्या. त्यांना आक्रमणांचा इतिहास होता, तरीही त्यांना औदार्याने वागवणं हे अंगभूत औदार्य शिवाजीपाशी होतं, हे इतिहासाच्या पटावर लक्षात घेणं आजही आपल्याकडून होत नाही आणि आजच्या काळाला ते relevant आहे म्हणून हा मुद्दा महत्त्वाचा आहे.

कुरुंदकरांचा मुद्दाच असा आहे की, मराठी माणूस जिथे शिवाजी महाराज अधिकाधिक मोठे करण्याचा प्रयत्न करतात, तिथे या पार्श्वभूमीवर शिवाजी छोटा करून पाहाण्याची कुरुंदकर तयारी दर्शवतात. मात्र तो कुणापेक्षा छोटा ठरवावा, याचं मोजमाप आहेच कुठे, हा प्रश्नही ते उपस्थित करतात. कुरुंदकरांचं विषयाला भिडण्याचं तंत्र इथे उठून दिसतं.

बहुतेक इतिहासकार शिवाजी महाराजांच्या इतिहासाला नेपोलियनच्या पॅरेमीटरवर जोखतात. पण कुरुंदकर १२०० वर्षांच्या भारतीय इतिहासाच्याच जमिनीवर शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेचं विश्लेषण करतात. कलिंग, यौधेयानंतर पहिल्यांदाच १२०० वर्षांनी शिवाजी महाराजांच्या राज्यात असं घडलं होतं की जनता युद्धात सहभागी होती. जे राणा प्रताप आदींच्याही भाग्यात नव्हतं. तिथे लढायची ती सेना. जनता उदासिनच असायची. महाराजांच्या मानवी हुशारीचं हे दुर्लक्षित कॅरेक्टरिस्टिक कुरुंदकर आपल्यासमोर उलगडतात.


पुन्हा मूळ प्रश्नाकडे येऊ. शिवाजी महाराजांचा पराभव... आधी स्पष्ट केल्याप्रमाणे शक्ती कमी पडणं हे एकमेव कारण पराभवामागे आहे आणि ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांचा पराभव आपल्याला उच्चारायला आणि पटायला धक्कादायक वाटला, तरी ते वास्तव आहे. आपल्या ध्येयासाठी ते झुंजत राहिले, ते ही बलाढ्य शत्रूपुढे. त्यात हार- जीत होतच राहाणार. जर आपण ४०० वर्षांपूर्वीच्या इतिहासातील राजांचा पराभव स्वीकारू शकत नसू, तर आपल्या स्वतःचा पराभव कसा स्वीकारणार? पराक्रम प्रेरणा देऊ शकतो. पण धडा मात्र पराभवातूनच मिळत असतो आणि हा धडा मोलाचा आहे. कुरुंदकरांनी म्हटल्याप्रमाणे पराभूत आणि गुलाम राष्ट्रांचा स्वातंत्र्याकडे जाण्याचा रस्ता सरळ कधीच नसतो. तो अनेक पराभवांनी आणि अनेक पीछेहाटींनी भरलेला, फक्त अभंग ध्येयवादाच्या सामर्थ्यावर यशाच्या टोकापर्यंत जाण्याचा रस्ता असतो. कोणत्याही देशाला असे पराभव पायदळी तुडवतच स्वातंत्र्यापर्यंत जावयाचे असते. शिवाजीचे मोठेपण ही वाटचाल करण्यात आणि वाटचाल आपण यशस्वी करू शकतो हा विश्वास चेतवण्यात असते. स्वातंत्र्य सवंग, सोपे आणि चटकन मिळणारे कधीच नसते. अलौकिक नेत्यांच्यासाठी सुद्धा हा प्रवास कष्टाचा आणि दीर्घ मुदतीचा अशतो. जे तत्व गुलाम राष्ट्रांना स्वतंत्र होण्याला लागू आहे तेच तत्व स्वतंत्र राष्ट्रांनी आपले वैभवशाली जीवन साकार करण्याला लागू असते. हाही प्रवास सोपा आणि झटकन आटोपणारा नसतो. समृद्ध जीवनापर्यंत जाण्यासाठी सतरा चढ उतार हिंमतीने पाहाण्याची तयारी असावी लागते. छोट्याछोट्या विजयांनी बेभान होणारी आणि क्षणकालच्या पराभवांनी एकदम हाताश आणि खच्ची होणारी मनोवृत्ती आपण जोपासलेली असते. हिच्यावर उतारा पराभवाच्या आठवणी सतत जाग्या ठेवणे हाच आहे. ही पराभवांची जंगले तुडवीतच एक दिवस हा देश विजयापर्यंत जाऊ शकेल. 

मुळात कुरुंदकरांचं वैशिष्ट्यच हे आहे, की त्यांची मतं ते मांडतात, तेव्हा ती सत्य आहेत, हे त्यांनी माहीत असतं पण त्यामुळे समोरचा माणूस आपल्यापासून तुटावा हे त्यांना कधीच वाटत नव्हतं. म्हणूनच ते कुठल्याही कंपूत दाखल झाले नाहीत. त्यांनी धर्म नाकारला म्हणून समाजवादी त्यांना गोंजारायला धावले, तर मोठ्या थाटात कुरुंदकरांनी आपल्या मुलाची मुंज लावली होती. हिंदुत्वावर हल्ला चढवला, कुराणावर अभ्यास होता. त्यांचा म्हणून 'जमात-ए- इस्लामी'ने त्यांना संमेलनाला बोलावलं, तर तिथे 'मी पूर्ण नास्तिक आहे, म्हणजे अल्लाचं अस्तित्वही मी मान्य करत नाही. त्यामुळे 'अल्ला न मानणाऱ्यांच्या जगण्याचा अधिकार नाकारणाऱ्या इस्लाम'च्या तुम्हा अनुयायांना माझ्या जगण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? हे थेट कट्टर मुस्लिमांच्या गर्दीसमोर विचारायची हिंमत त्यांच्यापाशी होती. शिवाजी महाराजांमधलं माणूसपण शोधण्याची दृष्टी अशाच माणसाकडे असू शकते.


एक थोडा वेगळा मुद्दा. आज ज्ञानपीठविजेत्या भालचंद्र नेमाडे यांचा नेमाडपंथ मानला जातो. देशीवादाला अनुसरून... पण साहित्यात असे पंथ निर्माण होणं हे सारस्वतांसाठी आणि समाजाच्या साहित्याकडे पाहाण्याच्या दृष्टीसाठी खूप महत्वाचं आहे, कारण साहित्यात समाज किती गुंतलाय, हे त्यातून स्पष्ट होत असतं. संत साहित्य आणि वारकरी संप्रदाय हे ही त्याचं अप्रतिम उदाहरण आहे. मला वाटतं, कुरुंदकरपंथ हा ही एक साहित्यातला पंथ आहे. स्वतः कुरुंदकर चार्वाकपंथाशी आपलं लोकायत नातं सांगू पाहातात, तेव्हा आपणही तर्कशुद्ध कुरुंदकरपंथ मान्य करायला हवा, असं मला वाटतं. कुरुंदकरांनी हे मांडलं एवढंच त्यांचं वेगळेपण नाही. तर त्यांनी लोकायत संप्रदायाला पुष्टी देत, ती दृष्टी देऊन वादांची वैदिक पंरपराही खुली केली होती. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर वैचारिक वाद आपण घालू शकू. पण तो वादही कुरुंदकरच घालून त्यावरचं प्रत्युत्तरही स्वतःच देऊन पुन्हा त्या प्रत्युत्तरातल्या दाव्यांवर हल्लाबोल करून मोकळे होतात. ही प्रोसेस अजिबात सोपी नाही. त्याचं आकलन होण्यासाठी आणि प्रतिवाद घालण्यासाठी वैचारिक सुस्पष्टता हवी आणि ती येण्यासाठी पुन्हा आपल्याला कुरुंदकरांच्याच लिखाणाचा आधार घ्यावा लागतो. बुद्धिनिष्ठेचा उगम इथेच होतो. आज कुरुंदकरांच्या विचारधारा अंगिकारणं जमो ना जमो, निदान त्यांच्या विचारपद्धतीचा अवलंब तरी आपण केलाच पाहिजे असं मला वाटतं. मी इथेच माझं भाषण संपवतो. धन्यवाद.

©आदित्य नीला दिलीप निमकर
९९२०७०२९१७

Saturday, December 13, 2014

'फिल्मी' गर्लफ्रेंड



युथचा लाडका भारतीय इंग्रजी लेखक चेतन भगत याचं नवं पुस्तक 'हाफ गर्लफ्रेण्ड 'या पुस्तकाची मी लोकप्रभा या मराठीतल्या अग्रगण्य साप्ताहिकासाठी लिहिलेली समीक्षा... या समीक्षेचं unedited व्हर्जन या ब्लॉगवर प्रसिद्ध करत आहे... या समिक्षेसोबत चेतन भगतची मुलाखतही मी घेतली होती, जी काही कारणास्तव प्रसिद्ध केली नाही.. ती मुलाखतही लवकरच या ब्लॉगवर अपडेट करेन...


चेतन भगतचं पुस्तक म्हणजे तरुणांसाठी पर्वणीच! सहसा इंग्रजीच्या वाट्याला न जाणारा भारतीय तरुणही चेतन भगतचं पुस्तक आवर्जून वाचतो. चेतन भगतने भारतीय इंग्रजी साहित्यात केलेली क्रांती दुर्लक्षित करताच येणार नाही. साधारण दशकभरापूर्वी 'फाईव्ह पॉइंट समवन' लिहून बॉलिवूड स्टाईल फिल्मी इंग्लिश पुस्तकांचा फक्त नवा ट्रेंडच सेट केला नाही, तर नवं मार्केट खुलं करून दिलं. चेतनच्या लिखाणातून इंग्रजी साहित्यात किती मोलाची भर पडली यावर टीकाकार वाद घालत असले, तरी देशी  इंग्रजी लेखकांच्या आणि वाचकांच्या संख्येत मोलाची भर मात्र नक्कीच पडली.

चेतन भगत स्टाईल पुस्तकं लिहिणारी एक पिढीच इंग्रजी साहित्यात निर्माण झाली. पण जसं दोन जेवणांच्या मध्ये लागणारी भूक भागवण्यासाठी चिवडा, फरसाणसारखे पदार्थ लोक खातात, तसंच चेतन भगतच्या दोन पुस्तकांमध्ये पडणाऱ्या गॅपमध्ये वाचकांची भूक भागवणारं चेतन भगत स्टाईलचं लेखन करणाऱ्या तरुण लेखकांची एक फलटणच भारतात निर्माण झाली.  आणि प्रकाशकांनाही सुगीचे दिवस आले. रस्त्यांवर पुस्तकं विकणाऱ्यांच्या पुस्तकविक्रीतही वाढ झाली. त्यामुळेच, जेव्हा 'हाफ गर्लफ्रेंड' हे त्याचं पुस्तक प्रकाशित होणार होतं, तेव्हा तो प्रकाशन सोहळा न राहता मेगा इव्हेंट बनला. 'फ्लिपकार्ट'ने बड्या इंग्रजी दैनिकाचं पहिलं पान 'हाफ गर्लफ्रेंड'च्या जाहिरातीने व्यापलं. प्री-ऑर्डर बुकिंगमुळे प्रकाशनाच्या दिवशी म्हणजे १ ऑक्टोबरलाच बहुसंख्य वाचकांच्या हातात हे पुस्तक पोहोचलं. प्रकाशनाच्या इव्हेंटचं इंटरनेटवर लाईव्ह चित्रिकरण लोकांना पाहायला मिळत होतं. बॉलिवूड स्टार कृती सॅनॉनने पुस्तकातला काही भाग वाचून दाखवला. मोहित सुरी या दिग्दर्शकाने आपण या पुस्तकावर सिनेमा बनवणार असल्याचं जाहीर केलं. मल्लिका-ए मालिका एकता कपूर या सिनेमाची निर्मिती करणार असून स्वतःचेतनही निर्मिती प्रक्रियेत सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलं. एकुणच 'हाफ गर्लफ्रेंड'बद्दल तरुणांमध्ये जबरदस्त उत्सुकता निर्माण करण्यात चेतनला यश आलं.

चेतन भगतचं पुस्तक म्हणजे वाचकांच्या आणि टीकाकारांच्या उड्या पडणं ठरलेलंच असतं. हाफ गर्लफ्रेंड या पुस्तकाच्या नावापासूनच त्यावर टीका व्हायला लागली. पण खरंतर टीका होण्यासारखं यात काहीच नाही. मुळात पुस्तकाच्या नावाचा आणि पुस्तकातील कथेचा काहीही संबंध नाही. पण आपल्या प्रत्येक पुस्तकाच्या नावाचा अंकांशी संबंध आणायचाच असा जो चेतनचा प्रयत्न असतो, त्या प्रयत्नांतून हाफ गर्लफ्रेंड हे शीर्षक जन्माला आलेलं वाटतं.  

अर्थात या कथेत मांडलेला विषय नक्कीच वेगळा आहे आणि महत्त्वाचाही. सध्याच्या भारतीय तरूण लेखकांनी साहित्यात वर्गभेदाबद्दल फारसं लिहिलेलं नाही. कदाचित शहरी तरुणांना वर्गभेद हा विषय फारसा अपिलिंग वाटणार नाही, असा समज असू शकतो. मात्र चेतन भगतने हा विषय आपल्या नव्या कादंबरीत कॉलेजगोईंग तरुणांना आवडेल अशा मांडून चांगलं काम केलं आहे. मात्र ६० पासून ते ९० च्या दशकापर्यंत बहुतेक बॉलिवूड सिनेमांचा फॉर्म्युला अशाच स्वरूपाचा आहे. या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हटलं तर हेच की इंग्रजीचा न्यूनगंड असणाऱ्या मुलाची इंग्रजी वातावरणातली घुसमट इंग्रजी पुस्तकातून लोकांसमोर आणणं. कॉलेजमधल्या सुरुवातीच्या दिवसांत इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण न झालेल्या अनेक मुला मुलींना इंग्रजीबद्दल भीती असते. कित्येक उच्चभ्रु इंग्रजाळलेल्या वातावरणातली मुलं इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषेत बोलणं कमीपणाचं समजतात. अशाच वातावरणात बिहारमधल्या दुर्गम भागातला बास्केटबॉलपटू मुलगा स्पोर्ट्स कोट्याद्वारे दिल्लीच्या सेंट स्टिफन्स कॉलेजात दाखल होतो. अशा कॉलेजांमधल्या हाय-फाय वातावरणाचं सुप्त आकर्षण आणि त्याचबरोबर स्वतःबद्दल वाटू लागणारा कमीपणा त्याला छळायला लागतो. अगदी पहिल्या मुलाखतीमध्येच डोक्यात हिंदी वाक्य इंग्रजीत भाषांतरित करून बोलताना त्याची उडणारी धांदल आणि त्यावर थंड पण बोचरी ब्रिटिश पद्धतीची प्रतिक्रिया देणारे कॉलेज प्रोफेसर्स या प्रसंगातच विषयाबद्दल अवाका जाणवू लागतो. ‘Without English I felt naked’ हे वाक्यच खूप काही सांगून जातं.

अर्थात 'व्हॉट यंग इंडिया वॉण्ट्स' पासूनच चेतनचा तरुणांकडे बघण्याचा उद्देश बदललेला दिसत आहे. तरुणांचे प्रश्न, त्यांची धम्माल आणि रोमान्स एवढ्यापुरताच मर्यादित न राहाता राजकारण, समाजकारण आणि त्यात तरुणांचा सहभाग हा विषय चेतनला महत्त्वाचा वाटतो. '३ मिस्टेक्स ऑफ माय लाईफ' पुस्तकात नको असतानाही राजकारणाशी संबंध आल्यामुळे गुजराती तरुणांवर ओढावलेली बिकट परिस्थिती चेतनने मांडली होती. मात्र, 'रेव्होल्युशन २०२०' या पुस्तकात तरुणांचा राजकारणातला सहभाग किती महत्त्वाचा ठरू शकतो, हे त्याने लिहिलं. या कथेत प्रेम-त्रिकोण रचला असला, तरी शिक्षणाच्या वाढत्या बाजारीकरणाची महत्त्वपूर्ण पार्श्वभूमी या कथेत जास्त प्रभावी ठरली होती. 'हाफ गर्लफ्रेंड'मध्येही प्रेमकथेला सामाजिक भानाची किनार दिली आहे. दिल्लीमध्ये शिकून तिथेच गब्बर पगाराची नोकरी करण्याची संधी उपलब्ध असतानाही आपल्या दारिद्र्य भरलेल्या गावात जाऊन आपल्या पूर्वजांनी सुरू केलेल्या शाळेची स्थिती सुधारणं 'हाफ गर्लफ्रेंड'मधल्या माधवला जास्त महत्त्वाचं वाटतं. शाळेला चांगली देणगी मिळावी यासाठी थेट बिल गेट्सला गवसणी घालतो. त्याच्यासमोर भाषण देता यावं यासाठी इंग्रजी शिकतो.

अर्थात कथा एवढीच नाही. सुरुवातीला इंग्लिश वातावरणात होणारी घुसमट, हाय-प्रोफाईल मुलीला ‘पटवण्यासाठी’ माधवची होणारी तगमग, रानटी रागाचा आणि वासनेच्या आवेगात तोंडातून निघणाऱ्या अर्वाच्य हिंदी शिविगाळीतून मुलीशी होणारं गैरवर्तन ही या कथेची महत्त्वाची अंगं आहेत. खरंतर याच वळणांवर कथा जास्त वाचनीय वाटते. मात्र दिल्ली ते बिहार, बिहार ते न्यूयॉर्क असा कथेचा होणारा प्रवास मात्र रटाळ होत जातो. जमीनदारी गेल्यावरही नावापुरती असणारी श्रीमंती टिकवण्याचा माधवच्या आईचा प्रयत्न, घटस्फोटित रियाचं गावात माधवबरोबर राहाण्याने त्याच्या आईला येणारा राग चुकीचा असला, तरी समजून घेण्यासारखा आहे. मात्र त्यातही चेतन भगतच्या पावलांवर पाऊल ठेवून लिहिणाऱ्या नव्या लेखकांच्या कथांमध्ये असणारा कथाभागच चेतनने वापरलेला दिसतो. उदाहरणार्थ, रियाला कॅन्सर असणं. कथेच्या दुसऱ्या टप्प्याच्या क्लायमॅक्सला माधवचं ईप्सित साध्य होताच तिचं त्याच्या आयुष्यातून निघून जाणं हे फारसं नाविन्यपूर्ण वाटत नाही. ‘बडे घर की लडकी असणाऱ्या रियाच्या वडिलांचा बडेजाव, त्यांनी तिच्यावर बालवयात केलेल्या लैंगिक अत्याचाराचे ओझरते उल्लेख, तिच्या मनाविरुद्ध श्रीमंत एनआरआय मुलाशी तिचं लग्न लावून देणं, या नवऱ्याचं दारू पिऊन तिला मारहाण करणं यातून विनाकारण श्रीमंत लोकांना जुन्याच परिप्रेक्ष्यातून पाहिलं जात असल्याचं जाणवतं. ‘खरं प्रेम श्रीमंतांच्या महालात नाही तर गरीबाच्या झोपडीतच...’ असं बॉलिवूडच्या निर्मितीपासून वापरलं गेलेलं घिसंपिटं प्रकरण या पुस्तकात आहे. नवऱ्याच्या जाचाला कंटाळून घरी परतलेल्या रियाला तिचे आई-वडील पुन्हा नवऱ्याकडे पाठवण्याचा प्रयत्न करतात. ‘अपने ससुराल वापस जा, लोग क्या कहेंगे’ असे संवाद ऐकवतात, हे मॉडर्न वाचकांना फारसं रुचणारं नाही. बरं, कथा फिल्मी होण्याचा प्रकार इथेच थांबत नाही. तर तो पाना पानागणिक वाढतच जातो. त्यात इंग्रजीचा न्यूनगंड, वर्गभेद हे मुद्दे मागेच राहतात. ‘बिल गेट्स फाऊंडेशन’च्या मदतीने न्यूयॉर्कला जाणारा माधव तिथे जाऊन इंग्रजीतून संवाद साधून आपलं स्थान, आत्मविश्वास मिळवतो असं दाखवलं असतं, तर कथा जरा प्रेरणादायी वाटली असती, किंवा निदान विषय भरकटलेला तरी वाटला नसता. पण ‘हाफ गर्लफ्रेंड’ ही फिल्मी प्रेमकथा असल्यामुळे माधव रियाला शोधत शोधत न्यूयॉर्क गाठतो, ते ही बिल गेट्स फाऊंडेशनच्या मदतीने. रिया न्यूयॉर्कच्या एखाद्या पबमध्ये गात असावी, एवढ्या एका अंदाजावरून माधवचं न्यूयॉर्कला जाणं, तिथे सराईताप्रमाणे वावरणं तार्कसंगत नाही. अर्थातच ही चेतन भगतने रचलेली प्रेमकथा असल्याने तर्कशास्त्राला चार हात दूरच ठेवावं लागतं.

खरंतर या कथेत इंडिया विरुद्ध भारत हा संघर्ष, वर्गभेद, स्त्री मुक्ती, शिक्षण यंत्रणेतले प्रश्न असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. मात्र कथा ज्या पद्धतीने मांडली आहे, ती कथनशैली फारच साधारण आहे आणि मोठमोठ्या मुद्द्यांना कथा फक्त स्पर्शून जाते, खोलात शिरत नाही. कदाचित, या विषयांशी मेट्रो रिडर्सशी निदान तोंडओळखही व्हावी, अशीच चेतन भगतची इच्छा असावी.

कॉलेजच्या दिवसांबद्दल लिहिण्याबद्दल चेतन भगत लोकप्रिय आहे. तरी या पुस्तकातलं कॉलेज लाईफ तितकंसं मजेदार वाटत नाही. मुलांच्या मनात मुलींबद्दल असलेल्या भावना धमाल ‘वन-लाईनर्स’मधून मांडण्यात चेतन भगतचा हातखंडा आहे. मात्र या पुस्तकात मनातल्या मनात गुदगुल्या व्हाव्यात किंवा निदान गालातल्या गालात हसावं असं काहीच नाही. एका मागोमाग घडणाऱ्या घडामोडींचीच मालिका आहे, त्यामुळे पुस्तक वाचत राहावंसं वाटतं. पण रटाळही वाटतं. कित्येकवेळा तर लेखकानं इथेच पुस्तक संपवलं असतं, तर बरं झालं असतं, असंही वाटून जातं. मात्र अवाजवी ‘ट्विस्ट्स अँड टर्न्स’ पुस्तकाचा चार्म घालवून टाकतात.
'फाईव्ह पॉइंट समवन' आणि 'टू स्टेट्स' या स्वानुभवावरून लिहिलेल्या पुस्तकात चेतनचं लिखाण जेवढं मजेदार वाटतं, तेवढं इतर पुस्तकांत वाटत नाही. आपल्या कॉलेज लाईफबद्दल लिहिताना खुलणारा चेतन हाफ गर्लफ्रेंड लिहिताना खुललेला वाटत नाही. एक मात्र खरं, की चेतनच्या लिखाणात थोडीबहुत प्रगल्भता यायला लागली आहे. केवळ तरुणांची धम्माल- मस्ती, विवाहपूर्व सेक्स या त्याच्या सगळ्या पुस्तकांच्या मांडणीत असणारा समान धागा या पुस्तकात नाही. या सर्वांच्या पलिकडे जाण्याचा चेतन भगतने प्रयत्न केला आहे. उथळपणा कमी करत तरुणांना सामाजिक जाण देण्याचा चेतनचा प्रयत्न तितक्याच रंजक कथासूत्रातून व्यक्त झाला, तर चेतन भगत 'सर्वाधिक वाचला जाणारा भारतीय इंग्रजी लेखक' या वाचकप्रिय बिरुदावलीपल्याड जाऊन टीकाकारांनाही गप्प करू शकेल.


'लोकप्रभा'मध्ये  प्रकाशित झालेला लेख वाचण्यासाठी- http://goo.gl/ve2cSy


- आदित्य नीला दिलीप निमकर
9920702917
adi.nimkar@gmail.com

Friday, January 10, 2014

अफाट आठवणींचा अजस्त्र गोफ

दिवाळीचा काळ दरवर्षी काही ना काही देऊन जातो. गेल्यावर्षी 'मिस्टर झी' पारितोषिक मिळालं. यंदा दिवाळीपूर्वीच कल्याणच्या 'सार्वजनिक वाचनालया'कडून मला पुरस्कार मिळाला. वाचनालयाला दीडशे वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेत 'मला प्रभावित करणारं पुस्तक' या विषयावर मी लिहिलेल्या लेखाला प्रथम पुरस्कार मिळाला. २५०० रुपये रोख, सुंदरशी ट्रॉफी, भलामोठा पुष्गुच्छ आणि सन्मानपत्र मिळालं. 
एखादं पुस्तक हातात घेतो, तेव्हा आपल्या काही त्या पुस्तकाकडून अपेक्षा असतात. राजकीय पुस्तक वाचताना राजकीय विचारसरणी, राजकीय निर्णय आणि त्यामागची कारणं, त्यांचे परिणाम यांची अधिकाधिक संदर्भासह माहिती मिळावी, अशी अपेक्षा असते. कवितासंग्रह वाचताना आपल्या संवेदना जाग्या होतील, भाषेचं माधुर्य नव्याने जाणवावं. कवीच्या उत्तुंग कल्पनांची झिंग आपणही अनुभवावं अशी आपली अपेक्षा असते.  तर कादंबरी वाचताना विरंगुळा एवढंच उद्दिष्ट असतं. अर्थात काही कादंबऱ्या या संदर्भग्रंथांपेक्षा जास्त माहितीपर आणि उद्बोधक असतात. 
 
मुळातच माझं वाचन हे काहीसं ऑब्सेसिव्ह पद्धतीचं. एखादा विषय मनाला भिडला, तर त्या विषयावरची जितकी मिळतील, तितकी पुस्तकं शोधून वाचायची. एखाद्या लेखकाने प्रभावित केलं, तर त्या लेखकाचं समग्र साहित्य वाचून काढायचं, अशी माझी पद्धत. अशा वाचनपद्धतीत मला सर्वांत जास्त कुठला साहित्य प्रकार वाचायला आवडत असेल, तर तो म्हणजे चरित्र किंवा आत्मचरित्र. हा साहित्यप्रकार अत्यंत गोळीबंद आणि तितकाच व्यापक असतो.  एखाद्या राजकीय किंवा सामाजिक संदर्भग्रंथांमधून तपशिल मिळतो. पण चरित्रामध्ये तत्कालिन परिस्थितीची स्पंदनं जाणवतात. घटनेकडे पाहाण्याची मनोभूमिका चरित्रांमधूनच दिसते आणि तरीही त्यात कल्पनेच्या डोहातल्या गटांगळ्या नसून व्यक्तिसापेक्ष सत्याची भक्कम जमीन असते. त्यामुळे अनेकदा अनेक विषयांवरील अभ्यासाची पुस्तकं वाचून जितकी गोष्ट कळत नाही, तितकी चरित्र किंवा आत्मचरित्रं समजावून जातात. चरित्रांमध्ये अर्थातच एक त्रयस्थता असते. आत्मचरित्रांमध्ये स्वतःचं मत पूर्णपणे समजून आपली बाजू मांडली असते. ते कदाचित पूर्णपणे प्रामाणिक असतं, किंवा नसतं. पण चरित्रांमधून मिळणारा एका समस्त काळाचा, एका पीढीचा धांडोळा स्तिमित करणारा असतो.

माझा आवडीचा आणि बराचसा अभ्यासाचा विषय म्हणजे नाटक. त्याच्याशी संबंधित बरीच पुस्तकं वाचली. देशोदेशींची नाटकं वाचली, पाहिली. विजय तेंडुलकर, गिरीश कार्नाड यांच्या नाटकांचं वाचन केल्यानंतर हळूहळू वाचन नाटकांच्या नाटकारांचं चरित्र समजवण्याच्या दिशेकडे वळलं. नाटक लिहिण्यासाठी आवश्यक ती मानसिक तयारी, अभ्यास, त्याचं क्राफ्टिंग हे कुठून निर्माण होतं, याचा वेध घ्यायचा प्रयत्न करू लागलो. या वाचनात हाती लागलेलं आणि सर्वांत प्रभावित करून गेलेलं पुस्तक म्हणजे विजया मेहता यांचं झिम्मा- गोफ आठवणींचा’…

विजया मेहता यांचा नाट्यसृष्टीतला दबदबा सर्वांना माहितीच आहे. त्यांची हमीदाबाईची कोठी, बॅरिस्टर, महासागर, पुरूष, मुद्राराक्षस, शाकुंतल यांसारख्या नाटकांबद्दल मी ऐकलं बरंच काही होतं. पण मला स्वतःला त्यांचं कुठलंही नाटक पाहायची संधी मिळाली नव्हती. बाई या उल्लेखासोबत असणारा दरारा माझ्या परिचयाचा होता. विक्रम गोखले, नाना पाटेकर यांसारखे नाट्यसृष्टीतली तालेवार मंडळी ज्यांचं नाव घेताना कानाच्या पाळीला हात लावतात, बाईंनी आम्हाला घडवलं असं दिमाखाने सांगतात, त्या बाई मुळात कशा घडल्या हे जाणून घ्यायची उत्सुकता मला होतीच. पण झिम्मा पुस्तकाने मला केवळ उत्सुकता शमवली नाही, तर विलक्षण अनुभुती दिली. झिंग म्हणजे काय आणि तिची नशा काय असते, याचा अनुभव वाचनातून आला. अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली. रंगभूमीचा अभ्यासही या पुस्तकातून घडला. हा इतरवेळी रंगभूमीशी संबंधित इतर अभ्यासग्रंथ वाचूनही झाला नसता.

झिम्मा- गोफ आठवणींचा या पुस्तकात नाट्यसृष्टीत वावरताना अनुभवास अलेले जादुई क्षण बाईंनी शब्दबद्ध केले आहेत. वाचताना पहिल्यांदा प्रभावित करून गेलेली गोष्ट म्हणजे विजयाबाई या माझ्या आजीच्याच वयाच्या. गिरगावातल्या मराठमोळ्या संस्कृतीत लहानाच्या मोठ्या झालेल्या... माझ्या आजीसारख्याच. मात्र तरीही किती विलक्षण जीवन जगलेल्या... अत्यंत समृद्ध आयुष्य विजयाबाई जगल्या आहेत. समाधान, समाधान असं आपण म्हणतो, ते नेमकं गवसतं कसं? ते या पुस्तकात जाणवलं. सुखी माणसाचा सदरा असेल वा नसेल, सुखी स्त्रीच्या साडीचा पदर मात्र पुस्तकात  जाणवला. विजयाबाईंच्या आयुष्यात दुःख आलंच नाही, असं नाही. अवघ्या सहाव्या वर्षी पितृछत्र हरवलं. तरुण वयात दोन मुलं पदरात टाकून पती अचानक संसार अर्धवट सोडून देवाघरी गेला. खरंतर हे किती मोठे आघात... पण यातून सावरून स्वतःचं आयुष्य कसं बाईंनी घडवलं, ते या पुस्तकात प्रभावीपणे मांडलं आहे. पुस्तकात बाई भेटतात त्या तीन नावांनी... ही तीन नावं म्हणजे तीन कालखंडाचं प्रतिबिंब आहे. तीन पिढ्यांची प्रगल्भतेकडे होणारी वाटचाल आहे. यात बाईंना भेटलेल्या विविध लोकोत्तर मंडळींचा सहभाग आहे. आधी बेबी, मग विजू जयवंत, त्यानंतर विजया खोटे, या ही पुढे विजया मेहता आणि सार्वकालिक बाई अशा बहुपेडी व्यक्तिमत्वाची विजयाबाईंनी आपल्या आत्मचरित्रात हातचं राखून न ठेवता ओळख करून दिली आहे. हातचं राखलं, तरी अपूर्णत्व यात नाही. मी या आधी वाचलेल्या अनेक आत्मचरित्रांनी मला असमाधानाचाच अनुभव दिला आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या गिरीश कार्नाड यांच्या खेळता खेळता आयुष्य या आत्मचरित्राने माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा नवे प्रश्नच मनात निर्माण केले. अगदी अमिताभ बच्चन, शाहरुख खानसारख्या सुपरस्टार्सचं चरित्र वाचतानाही बऱ्याचशा गोष्टी दडवल्या गेल्याचं लक्षात येत होतं. आपली इमेज संभाळण्याचा सोस बाळगून चरित्र लिहिलं की अशी गल्लत होते. त्यापेक्षा आपण केलेल्या चुकीचं समर्थन आपल्या चरित्रात केलं, तर खपून जातं. निदान आपल्यापुरता लेखक प्रामाणिक राहून आपली भूमिका मांडत असतो. (कधी कधी तेवढ्यासाठीच त्याने चरित्रप्रपंच मांडला असतो.)      

बाईंच्या चरित्रात इमेज संभाळण्यापेक्षा नाटकातल्या बॉडी इमेजेस कशा मिळवाव्यात, याचं यथार्थ वर्णन मिळतं. आपल्या प्रत्येक वागण्यामागचे विचार बाईंनी परखडपणे मांडले आहेत. नॉट विदाऊट माय डॉटर, अमार मेयाबेल आणि अशी अनेक अफगाणी, इराणी, पाकिस्तानी स्त्रियांची संघर्षात्मक चरित्रं मी वाचली. प्रभावितही झालो. पण कट्टर मुस्लिम राष्ट्रांमधल्या अपवादात्मक बंडखोर स्त्रियांसारख्या बाई नसूनही त्या तितक्याच बंडखोर वाटतात. स्त्री मुक्ती आंदोलनात सहभागी नसूनही स्त्री मुक्तीचे धडे आपल्या आत्मचरित्रातील पाना पानांत मांडतात... ते ही स्वतः अनुभवलेले. केवळ प्रमेयरुप नव्हे. एक मराठी बुद्धिवादी स्त्री कुठलाही मोठा संघर्ष न करता आपल्या मध्यमवर्गीय संस्कारांतून एक विश्व निर्माण करते. अभिनय, दिग्दर्शन क्षेत्रात आपल्या नावाचं घराणं निर्माण करते. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःच्या नावाचा ठसा उमटवते, हे विलक्षण वाटतं. ती गरीब घरात जन्म घेऊन संघर्ष करत त्या पदापर्यंत पोहोचलेली नाही. ती तोंडात चांदीचा चमचाही घेऊन जन्माला आली नाही. पण तिच्यावर संघर्षाची वेळही येऊ नये, म्हणजे नशिबालाही काय दरारा जाणवत असेल या स्त्रीचा? याचं आश्चर्य वाटतं. जीवनाकडे बघताना ती स्त्री काळाच्या बरीच पुढे होती. हे मला जास्त भावलं. मराठी आणि अमराठी वादावर जिथे आजही राजकारण तापतं, तिथे बाई दोन्ही संस्कृतींमध्ये सहजपणे सामावून जातात, चपखल बसतात. एवढंच नव्हे, तर आपली दखल घ्यायला भाग पाडतात.

मराठीतील आद्य आत्मचरित्र स्मृतिचित्रेमधील लक्ष्मीबाई या पारतंत्र्यातील सनातन, सोवळ्या घरातील सवाष्ण महिला... पतीच्या चंचल, लहरी निर्णयांचा सोवळ्या मनावरचा परिणाम त्यांच्या लिखाणात आहे. विजयाबाईंचा काळ बराच नंतरचा... पण जुन्या चालीरीतींची सावली बाईंच्या बालपणावर आहेच. बाईंचा काळ म्हणजे कालखंडाचा भव्य पट पाहिलेल्या पिढीचा. ज्यांनी दुसरं महायुद्धही अनुभवलं, स्वातंत्र्य पाहिलं, नव्याने स्वतंत्र झालेल्या देशाची पहिली पिढी म्हणून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं, अशा महिला... बाईंचं आयुष्य किती समृद्ध? जमिनदार घराणं. एकीकडे भक्तांनी वेढलेले बुवा बनून गेलेले काका, तर दुसरीकडे तुझ्या कामाची जबाबदारी देवाची नाही, तर तुझीच असा पुरोगामित्वाचा धडा शिकवणारे नानासाहेब रानडे, एकीकडे आजीचं लाल अलवणं तर दुसरीकडे राष्ट्रसेवादलाची खादी. नलिनी जयवंत, शोभना समर्थ, नुतन, तनुजा अशा प्रख्यात अभिनेत्रींशी आई- वडिलांकडून वारशाने मिळालेलं नातं असूनही त्यांचा फार कमी प्रभाव पडलेल्या बाई, तर पं. जवाहरलाल नेहरूंच्या हलक्याशा स्पर्शासाठी धावपळ करणाऱ्या जबरदस्त फॅन बाई...


पुढे पुढे तर बाईंच्या आयुष्यातील अशा विविध गोष्टींचा अवाका एवढा वाढत गेला आहे, की थक्क व्हायला होतं. त्यांची सकाळ साहित्य संघात गणपतराव बोडस, केशवराव दाते यांसारख्या नटश्रेष्ठांसोबत, दुपार इब्राहिम अल्काझींसारख्या दिग्गज पाश्चात्य शैलीच्या दिग्दर्शक गुरुंसोबत तर संध्याकाळी चौपाटीवरची भेळ साक्षात पु.ल देशपांडे आणि सुनीता ताईंसोबत... जगातलं कुठलं व्यक्तिमत्व विकास शिबिर याहून चांगलं ग्रुमिंग करू शकेल?  असं भाग्य असावं... अभिनयाचं शिक्षण, दिग्दर्शनाचे धडे अल्काझी, आदी मर्झबान, दुर्गाबाई खोटे यांच्याकडून.. आणि लग्नाची वेळ आल्यावर कुठलंही प्रेमप्रकरण न घडता किंवा अडचण न येता थेट दुर्गाबाईंच्या सुविद्य आणि सुशील मुलाशी अरेंज्ड मॅरेज... कुठे आधुनिक, तर कुठे पारंपरिक स्त्री अशी विजयाबाईंची प्रतिमा... संभ्रमात टाकण्यापेक्षा कौतुकास्पद वाटते.

वयाच्या एकविसाव्या वर्षीच खुद्द विजय तेंडुलकरांकडून त्यांना मिळालेली बाई ही पदवी त्यांच्या प्रतिभेची साक्ष देते. रंगायन चळवळीच्या आठवणींबद्दल बोलताना तर लुचत असलेलं बाळ मध्येच थांबून मातेकडे जसं गोडसं हसत पाहातं, तसं त्या पाहातात. वाद विवाद एखादी नाट्यसंस्था कशी फोडतात, हे मराठी रसिकांसाठी नवीन नाही. तरीही मराठीत एक नाट्य चळवळ उभी करणं, तिचं कणखर नेतृत्व करणं, या गोष्टी बाईंबद्दलचा आदर वाढवतात. पुन्हा या संस्थेच्या परिसरात त्यांच्या तालमी पाहायला येणारे लोक तरी कोण?... भारतरत्न पं. रवीशंकर, संतुरवाद पं. शिवकुमार शर्मा!...मराठी रंगभूमीवर रेनसां निर्माण करणाऱ्या बाईच. विवाह होऊन जमशेदपूरला बाई गेल्या आणि नाटकांशी संबंध तुटला, असं एखाद्या गृहिणीला शोभणाऱ्या  घटनेतूनही बाईंच्या आयुष्यातील वेगळेपणा भावतो. जमशेदपुरात नाटक करणं, ते ही टाटा मोटर्सचे बेताज सर्वेसर्वा सुमंत मुळगांवरांच्या सांगण्यावरून!... पत्नी नाटकांशिवाय तळमळतेय, हे लक्षात येताच तिच्यासाठी पुन्हा मुंबईला बस्तान हलवणारा, प्रसंगी नोकरी बदलणारा पती हिरेन... 

वयाच्या अठराव्या वर्षी आपलं कार्यक्षेत्र सरकारी नोकरी किंवा सिनेमा इंडस्ट्री नसून नाट्यक्षेत्र आहे, याची झालेली जाणीव ही बाबच विजया बाईंच्या स्पष्ट विचारपद्धतीची जाण देते. नाट्य क्षेत्रातले त्यांनी लिहिलेले एकेक अनुभव तर अफाटच... 

गो.नी.दांची शितू साकारताना त्यांनी शोधलेली बॉडी इमेज आणि त्यानंतरच्या अनेक नाटकांमध्ये (संध्याछाया, हमिदाबाईची कोठी इ.) आपली बॉडी इमेज शोधण्याचा प्रयत्न हा नवोदितच नव्हे, तर कसलेल्या रंगकर्मींनाही वस्तुपाठ ठरावा असा. प्रायोगिक मराठी रंगभूमीवर सशक्त वावर सुरू असतानाच लोकमान्य रंगभूमीकडे (व्यवसायिक किंवा धंदेवाईक शब्दाला इतका सकारात्मक शब्द फक्त बाईंनाच सुचू शकतो.) बाई आल्या. आणखी एक नवा प्रवास सुरू झाला. या रंगभूमीवरही बाईंनी अनेक तगडी नाटकं सादर केली. हमिदाबाईची कोठी सारखं नाटक असो वा बॅरिस्टर, जास्वंदी असो वा संध्याछाया... अभिनेत्री म्हणून त्यांचा अवाका आणि दिग्दर्शिका म्हणून त्यांची हुकुमत पुस्तक वाचतानाही प्रत्ययाला येते. विजय तेंडुलकरांसारख्या लेखकाला ओळख मिळवून देण्याचं काम बाईंनी केलं. तर लोकमान्य रंगभूमीवर एक पर्व त्यांनी निर्माण केलं. सशक्त अभिनय करणाऱ्या दमदार कलाकारांची फौज बाईंनी तयार केली.

मराठी रंगभूमीसोबतच इंग्रजी आणि जर्मन रंगभूमीवरही बाईंचा दरारा कायम राहिला. पु.ल. देशपांडेंची लाघवी नाटकं करत असताना एकीकडे ब्रेख्तसारख्या नाटककाराला मराठी मातीत रुजवण्याचं कार्य त्यांनी केलं. मराठीच्या बंदिस्त नाट्यगृहात न अडकता ग्रीक, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन रंगभूमीलाही सहज गवसणी घातली. पायाखाली मराठी माती असली, तर आकाशाला सीमा नव्हती. थिएटर ऑफ अॅब्झर्ड करण्याची हिंमत त्यांनी दाखवली. सार्त्र, बेकेटची नाटकं जी जगभरातल्या भल्याभल्यांना चकवतात, त्याच्यात काम करण्याची संधी बाईंना मिळाली. दुसरे पती फारोख मेहतांसोबत इंग्लंडला वास्तव्यासाठी गेल्यानंतर तर ऑक्सफोर्ड सारख्या अनेक विद्यापीठांची शिष्यवृत्ती मिळवत बाईंनी जागतिक रंगभूमीचं साक्षेपी ज्ञान मिळवलं. मुख्य म्हणजे चरित्रात पाश्चात्य कसे चांगले आणि आपण किती मागे अशा पद्धतीचा निरर्थक तौलनिक अभ्यास न करता त्या जागतिक रंगभूमी आणि भारतीय रंगभूमी यांच्यातल्या दुवा बनल्या. विजया बाई नामक पुलावरून मराठीतील तमाशा प्रकार ऑक्सफोर्ड विद्यापीठात गेला. कुडियाट्टी हा केरळी प्रकार जर्मन थिएटरमध्ये सादर झाला. मुद्राराक्षस, शाकुंतलसारखी एतद्देशीय संस्कृत नाटकं जर्मन भाषेत सादर झाली, गाजली. आधुनिक भारतातील महत्वाचे नाटककार, ज्यांचा अमरीश पुरी तत्वज्ञ नाटककारअशा उल्लेख करत, त्या गिरीश कार्नाडांचं हयवदन आणि नागमंडल त्यांनी जर्मनीत सादर केली. वास्तविक मी ही नाटकं वाचली होती. पण काही केल्या मला या नाटकांचा रंगमंचीय अविष्कार डोळ्यांसमोर आणता येत नव्हता. विजयाबाईंनी केवळ तो कसा सादर केला, एवढंच या पुस्तकात लिहिलेलं नाही, तर त्याचे अर्थ बाईंनी प्रकट केले. पारंपरिक कथांमधलं नाट्य आणि त्यांना समकालीन संदर्भ देणं, बिटवीन द लाईन्स शोधणं, याचं भान मला हे पुस्तक वाचताना आलं. ऑक्सफोर्डमध्ये शिकताना आलेले अनुभवच बाईंनी शब्दबद्ध केले नाहीत, तर तेथील शिक्षणही आपल्या आत्मचरित्रामार्फत भावी रंगकर्मींना दिलं आहे. सरधोपट पद्धतीचा अभनय आणि आडतालातला अभिनय त्यांनी फोड करून सांगितला. विसंगत अभिनयातील ताकदही दाखवली. संवाद म्हणजे हिमनगाचं टोक असतं, खरा भावनांचा पर्वत मनात उभा करायचा असतो, तो ही केवळ पात्रांपुरताच, हे ज्ञान यथार्थ आहे. केवळ आपल्या यशस्वी नाटकांबद्दल लिहून अपयशी नाटकांकडे डोळेझाक बाईंनी केली नाही. तर अयशस्वी झालेल्या नाटकांची कारणमीमांसा शोधणारं स्वतंत्र प्रकरण त्यांनी लिहिलंय. हे प्रकरणही नाट्यशिक्षणाच्या अभ्यासक्रमात वापरावं, इतकं जबरदस्त आहे. अनेकांशी मतभेद, वाद होऊनही बाईंनी संबंधित व्यक्तींबद्दल आकसानं न लिहिता वादाचं स्वरूप सांगत संबंधित व्यक्तींबद्दल आत्मियतेनेच लिहिलं आहे. आपल्या चरित्राला वादांचं गालबोट लागू दिलं नाही. त्यामुळे आठवणींचा गोफ हा गोफच राहिला आहे. इतरांवर डागणारी तोफ झाला नाही.

बाईंचा जन्म हा नाटकासाठीच झाला आहे, हे त्यांच्याबद्दल वाचताना जाणवलं. बाळंतीण होईपर्यत आणि बाळंतीण झाल्यावर १२-१५ दिवसांत तालमीला उभं राहाणं बाईंमध्ये असलेली झिंग दाखवतं. इतकंच नव्हे तर पती निधनानंतरही घटकाभर वियोगानंतर पुन्हा रंगमंचावर उभं राहाणं, हे बाईंचं केवळ व्यावसायिक शिस्तच नव्हे, तर भक्तीभाव दर्शवतं. पतीच्या मृत्यूनंतरही जेव्हा बाई पहिल्यांदा रडल्या, त्या घरात नाही, तर रंगमंचावरच्या प्रोसिनियम आर्कमध्ये परफॉर्म करताना... बाईंचे अश्रूही नाटकाच्या पात्राला मिळाले. ही उदाहरणं बाईंच्या व्यक्तिमत्वाची शक्ती दाखवण्यास पुरेशी आहेत. अशा एक दोन नव्हे, तर असंख्य अनुभवांचा गोफ झिम्मा पुस्तकात वाचायला मिळतो. एका अजस्त्र अनुभवाला सामोरं गेल्याची भावना जागी होते. एका सुखवस्तू बाईची प्रतिभा तिला किती रम्य अनुभवांच्या लाटांवरून फिरवते, याचा प्रत्यय येतो. ज्यातला थेंबभर अनुभव आपल्याला मिळावा, अशी आपण मनिषा बाळगतो, त्या अनुभवांचा महासागर बाईंकडे आहे.
 
बाईंना जर्मन सरकराकडून फ्रेंड ऑफ पीपल्स हा अद्वितिय सन्मानही प्राप्त झाला. हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि दुसऱ्या अशियाई नागरीक... जर्मनी हे तर त्यांचं माहेरच बनलं. याशिवाय न्यूयॉर्कमध्ये लेटर्स टू डॉटर्सचा अद्भुत प्रयोग त्यांनी केला. फ्रेंच महाभारतासाठी पीटर ब्रुकच्या खांद्याला खांदा लावून इतिहास घडवला.   

नाटकांपलिकडे जात बाईंच्या आयुष्यातलं माध्यमांतरही तितकंच प्रभावी आहे. स्मृतीचित्रेवर सिनेमा बनवण्यासाठी त्यांना सल्ला देतात, ते साक्षात व्ही. शांताराम... सिनेमाचं शिक्षण घ्यायला जावं, तर थेट श्याम बेनेगल सारखे दिग्दर्शक लहानशी भूमिका करत तंत्र शिकून घे अशी ऑफर देतात... यांसारखे अनुभव किती व्यापक स्तरावर घेऊन जाणारे असतात, याची झलक झिम्मा वाचताना मिळते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचं त्यांनी भूषवलेलं चेअरमन पद असो, वा १२ वर्षं एन.सीपी.ए सारख्या संस्थेची वाहिलेली धूरा असो. बाई या तितक्याच प्रभावी आणि कणखर असल्याचं जाणवतं. यासाठी कुठल्याही स्त्री लेखिकेप्रमाणे त्यांनी स्त्री मुक्ती, बंडखोरी अशा शब्दांचा आधार घेतलेला नाही. एक व्यक्ती म्हणून कशा रीतीने त्या समृद्ध होत गेल्या, जगण्याला कशा रीतीने भिडल्या याचीच माहिती दिली आहे.
दुःख त्यांच्या वाट्याला आलीच नव्हती, असं नाही, पण पतीच्या मृत्यूनंतर कामामध्ये स्वतःला झोकून देणं, दुसऱ्या लग्नाचा योग्य निर्णय घेऊन तो इतरांचा नकार झेलत पूर्ण करणं आणि त्यातून पुन्हा संसारी स्त्री आणि रंगकर्मी अशी तारेवरची कसरत करणं हे बाईंच्या बहुआयामी व्यक्तित्वाचं लक्षण प्रकर्षाने जाणवतं.

सर्व लिखाणात मला आवडलेली गोष्ट म्हणजे लिखाणाचं झालेलं संपादन. अंबरीश मिश्रंचं याबद्दल कौतुक. लिखाणाची शैली, त्यातली घटनांची मेख. कधी नाट्य प्रवास आणि त्यात इतर गोष्टी विसरण्याच्या आतच पुन्हा लिहिलेल्या कौटुंबिक आघाडीवरच्या घटना. काही सुसंस्कृत मराठीतले काळाआड लोप पावत असलेले शब्द, अजिबात बोजड न होता गप्पांमध्ये रंगावी तशी भाषा... त्यात बासुंदीचा गोडवा चाखताना दाताखाली बदाम येऊन मजा द्यावी, तसा येणार एखादा उर्दू शब्द... भाषेतलं लालित्य पूर्णपणे जपलं आहे.


रंगकर्मींनी हे पुस्तक वाचलं, तर त्यांची रंगभूमीबद्दलची जाण समृद्ध होईल. इतरांनी वाचलं तर एका बाईची झेप किती अफाट असू शकते, याची माहिती मिळेल. झिम्मा नावाचा गोफ विणताना प्रभावित करू शकणाऱ्या घटनांची मालिका आशयघन आणि संपन्न आहेच, पण तितकीच मातीतली आणि बहुपेडी आहे. हे पुस्तक एकदा वाचलं तर अवाक व्हायला होतं. पण पुन्हा पुन्हा वाचलं, की त्यांच्या आयुष्यातल्या कित्येक घटना जगण्याची प्रेरणा देऊ लागतात. जादुई क्षण अनुभवायची झिंग देतात. संघर्षापलिकडे पाहात ध्येय, स्वप्न, ध्यास आणि जगण्याचे क्षण चिरंतन करून जाण्याचं बळ देतात. त्यासाठी हे पुस्तक नुसतं वाचूच नये, तर प्रत्येकाने संग्रही ठेवावं असं आहे.