Friday, January 10, 2014

स्मारकांचे मारेकरी!

शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की मराठी माणसाचं ऊर अभिमानानं भरून येतं... महाराजांची कीर्ती जगात पोहोचावी, यासाठी अरबी समुद्रात त्यांचा भव्य पुतळा उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारनं आखली आहे. देशाच्या राजधानीत असलेल्या महाराजांच्या पुतळ्याची दुरवस्था मात्र राज्यकर्त्यांना दिसत नाहीये...

अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या शिवाजी महाराजांचा हा देशाच्या राजधानीत असलेला पुतळा... एकेकाळी दिल्ली स्टेशनवर उतरताच नजरेला पडणारा हा 40 फुटी पुतळा आता जंगलात हरवलाय... याकडे ना दिल्ली पालिकेचं लक्ष आहे ना उठसूठ दिल्लीला पळणा-या मराठी नेत्यांचं... 

काही दिवसांपूर्वी पुतळ्याचा जिरेटोप आणि तलवारीचं म्यान चोरट्यांनी लांबवलं होतं. पण हा पुतळा घडवणारे शिल्पकार भाऊ साठे यांनी याची काहीच माहिती न देता कोणत्यातरी होतकरू शिल्पकाराकडून त्याची डागडुजी करून घेतली गेली... ही संतापजनक बाबही मराठी नेत्यांच्या नजरेआडच राहिलीये... 

केवळ शिवाजी महाराजच नव्हे, तर `चलो दिल्ली`चा नारा देणारे सुभाषचंद्र बोस यांचं स्मारकही गायब झालंय. लाल किल्ल्यासमोर पूर्वी हे स्मारक होतं... मेट्रो स्टेशन बांधण्यासाठी ते हटवण्यात आलं. खरंतर हे स्मारक सन्मानानं अन्यत्र हलवता आलं असतं... मात्र ती तसदी कोणीच घेतली नाही... महत्त्वाची बाब म्हणजे, असा ग्रूप स्टॅच्यू घडवणं कठीण असतो. चार मानवी आकृती, रायफल्स, झेंडा, तोफेचा गाडा हे एकत्र असलेला हा देशातला एकमेव ग्रूप स्टॅच्यू आहे... आता हा पुतळा कुठे आहे, हे कोणालाच माहिती नाही.... 

सुभाषबाबू असोत की शिवाजी महाराज... राजधानीत असलेल्या या राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांकडे कोणाचंच लक्ष नाही... ना राजकारणात रंगलेल्या दिल्लीतल्या नेत्यांचं, ना दिल्लीचे उंबरठे झिजवणा-या मराठी नेत्यांचं, ना महाराजांच्या नावानं मतं मागणा-यांचं.... 


आदित्य नीला दिलीप निमकर
९९२०७०२९१७
adi.nimkar@gmail.com

No comments:

Post a Comment